वादळी वारे, आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करू नये, याबाबत प्रशासनाने नागरिकांसाठी सुचना जारी केल्या आहेत. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जावून गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरातील विद्युत उपकरणे त्वरीत बंद करावे, ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुंपासून दूर रहावे. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे.
आकाशात विजा चमकत असल्यास फोनचा वापर करू नये. शॉवरखाली आंघोळ करू नये. घरातील बेसीनचे नळ, पाण्याची पाइपलाइन यांना स्पर्श करू नका. तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा उपयोग करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे वाहत असताना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नये. धातुच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असाल तर उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका, हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी धान्याची उचित काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.