गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शासन-प्रशासनाने कितीही जनजागृती केली तरीही दिवसागणिक बालविवाहांची संख्या वाढत चालली आहे. बीडमध्ये चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून अनेक बालविवाह रोखण्यात आले आहेत. अशातच जिल्ह्यातील शिरूर कासार या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा तीन वर्षात तीनवेळा विवाह करण्यात आला. मात्र तिसरा विवाह करत असताना हेल्पलाइनकडे तक्रार प्राप्त झाली आणि मोठा अनर्थ टळला.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शिरूर कासार येथील बावी गावातील ऊसतोड मजुराच्या एका मुलीचा पहिला विवाह अवघ्या १४व्या वर्षी झाला. २२ डिसेंबर २०२० रोजी लोखंडा येथील एका तरुणाशी तिचा विवाह लावण्यात आला. मात्र अवघ्या दहा महिन्यात ही अल्पवयीन मुलगी आपल्या माहेरी परत आली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा याच मुलीचा विवाह १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सातारा येथील एका तरुणाशी लावून दिला. मात्र या ठिकाणीही वाद झाला आणि तिचा संसार मोडला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी ७ जून २०२३ रोजी या अवघ्या १७ वर्षाच्या मुलीचा विवाह ३४ वर्षीय व्यक्तीशी पुन्हा एकदा लावण्यात आला. या संपूर्ण प्रकाराची माहिती चाईल्ड लाईनचे तत्त्वशील कांबळे यांना मिळताच त्यांनी या घटनेची माहिती शिरूर कासार पोलीस ठाण्यात दिली आणि या लग्नाची संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आणि हा विवाह रोखण्यात आला.
दरम्यान, एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी धडपड चालू असताना दुसरीकडे एकाच अल्पवयीन मुलीचे तीन विवाह करण्याचा प्रकार उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.