• Sat. Sep 21st, 2024
कोल्हापूर दंगल: सरकारचा एक निर्णय आणि जिल्ह्यात कोट्यवधीचा फटका, राड्यानंतर नेमकं काय झालं?

कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वातावरण आणखी खराब होऊ नये, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तब्बल ४२ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फार मोठा फटका जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीला बसला आहे. बँका, पतसंस्थाच नव्हे तर अनेक दुकानातील आर्थिक व्यवहारच ठप्प झाल्यामुळे दुकान उघडे असूनही व्यवहार मात्र झाले नाहीत. तसंच ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसल्याने आयटी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.

कोल्हापूर शहरातील काही युवकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर शहरात दंगल झाली. मोडतोड, दगडफेक या पार्श्वभूमीवर वातावरण तणावपूर्ण झाले. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बुधवारी सायंकाळनंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. ही सेवा गुरुवारी दिवसभर, तर शुक्रवारी सकाळी १० पर्यंत बंद होती. ४० तासांपेक्षा अधिक काळ इंटरनेट बंद राहिल्याने जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीला मोठा दणका बसला.

महसूल खात्यातील अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या घरी सीबीआयचा छापा, पुण्यात खळबळ

अलीकडे नोटा किंवा पैशापेक्षा फोन पे, गुगल पे, पेटीएमसह क्यूआर कोड स्कॅन करून पैसे ट्रान्सफर केले जात आहेत. नेट बंद झाल्याने हे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले. बँका, पतसंस्था यामध्येही आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय पेमेंट अशा पद्धतीने ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. नेट नसल्याने त्याच्यावरही परिणाम झाला. बँका, पतसंस्था उघड्या होत्या पण व्यवहाराविनाच. केवळ सोन्याच्याच नव्हे तर मॉल, किरकोळ दुकाने एवढेच काय तर भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहारातही सध्या ऑनलाईन पेमेंट करण्यात येत आहे .पण गुरुवारी दिवसभर नेट बंद असल्याने अशा प्रकारचे व्यवहार झाले नाहीत. बुधवारी दिवसभर कोल्हापूर बंद होते. त्याचा फटका कोल्हापूरकरांना बसला आणि दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत झाले. पण इंटरनेट बंदीमुळे आर्थिक व्यवहारावर मर्यादा आल्या.

या इंटरनेट बंदीचा दणका आयटी क्षेत्रालाही बसला. जिल्ह्यात वर्क फ्रॉम होम काम करणारे २० हजारावर कर्मचारी आहेत. नेट बंद राहिल्याने त्यांचे काम ठप्प झाले. शाहू सुविधा केंद्रात मोठ्या प्रमाणात दाखले दिले जातात. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आहे. पण नेट नसल्याने कोणत्याही प्रकारचे दाखले निघू शकले नाहीत.

दरम्यान, सध्या अनेक परीक्षांचे निकाल लागले आहेत. प्रवेशासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर अशा अनेक प्रकारचे दाखले लागतात. नेट नसल्याने गुरुवारी दिवसभर अशा प्रकारचे दाखले मिळू शकले नाहीत. याचाही फटका विद्यार्थ्यांना बसला. नेट नसल्याचा दणका शासकीय कामावरही जाणवला. बहुतांशी काम आता ऑनलाईन चालत असते पण ही यंत्रणाच ठप्प झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed