दौंड : अलिकडच्या काळात अफाट खर्च करत शाही विवाह सोहळे पार पाडण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर लग्न मंडपात हेलिकॉप्टरमधून वधू वर आल्याचेही आपण ऐकले व पाहिले आहे. मात्र यापैकी कोणताही बडेजाव न करता लग्नातील अनावश्यक खर्च टाळून तब्बल अडीच लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व आश्रम शाळेला देत एका जोडप्याने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील डाळिंब गावातील गायकवाड कुटुंबाने हा निर्णय घेतला.कुंडलिक गायकवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव वाल्मिक गायकवाड यांची कन्या अंकिता हिच्या लग्न प्रसंगी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा एकीकडे मान सन्मान करतानाच, दुसरीकडे गायकवाड कुटुंबियांनी विवाह सोहळ्यातील थाटमाट टाळला. अनावश्यक खर्च टाळून तब्बल अडीच लाख रुपयांची मदत करुन आपणही समाजाचे काही देणे लागत असल्याचे दाखवून दिले आहे. कुंडलिक गायकवाड व त्यांच्या कुटुंबियांनी मुलीच्या विवाह सोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख एकावन्न हजार रुपयांचा निधी दिला, तर नगर जिल्ह्यातील “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळा” या शाळेसाठी एक लाख एक हजार रुपयांचा निधी दिला आहे.
तू पास होणार नाही, मित्रांनी वर्षभर हिणवलं, पठ्ठ्याने सगळ्यांना तोंडावर पाडलं, उंटावरुन मिरवणूक काढली!
कुंडलिक गायकवाड यांची नात अंकिता हिचा विवाह वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील लक्ष्मण श्रीपती गावडे यांचे चिरंजीव अजित गावडे यांच्याबरोबर नुकताच हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे पार पडला. या विवाहप्रसंगी एसजीए ग्रुपचे अध्यक्ष शंकर गायकवाड व त्यांचे बंधू वाल्मिक गायकवाड यांनी आपल्या वडिलांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख एकावन्न हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे सोपवला. तर “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेसाठी” एक लाख एक हजार रुपयांच्या निधीचा धनादेश दिला आहे.
नवरीची लग्नमंडपात खास एंट्री; भारतीय संविधानावर शपथ घेऊन वधू-वरानं बांधली लग्नगाठ
लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची गोष्ट असते. मोठे लग्न व्हावे तसेच मोठ्या लोकांनी आपल्या लग्नाला यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र गायकवाड व गावडे परिवाराने लग्नातील अनावश्यक खर्च टाळून, मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करतानाच, शाळेसाठीही एक लाख रुपयांची मदत करुन दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्याला एक चांगला आदर्श घालून दिला आहे.
दहावीला सर्वच विषयात ३५ मार्क, जुन्नरचा वैभव काठावर पास, गुण बघून तोंडातून फुटले दोनच शब्द