• Mon. Jul 27th, 2026
    मुंबई, ठाणे, कल्याणकरांना शिर्डी आणखी जवळ; इतक्या तासांत गाठता येणार साई मंदिर

    अहमदनगर : आज समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. दुसरा टप्पा ८० किलोमीटरचा असून तो शिर्डी ते भरवीर असा असणार आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने मुंबई शिर्डी अंतर कमी वेळेत गाठता येणार आहे. मुंबईहून शिर्डी २५० किलोमीटर अंतरावर आहे. सध्या यासाठी ५ तासांपेक्षाही जास्त वेळ लागतो. समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचा मुंबईच्या भाविकांना फायदा झाला नव्हता. कारण शिर्डी हा नागपूरहून येतानाचा एंड पॉईंट होता. आता शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर या ८० किमीचं काम पूर्ण झालं आहे. या ८० किमीसाठी फक्त ४०-४५ मिनिटं लागणार आहेत.

    मुंबईहून निघाल्यास सध्या घोटीपर्यंत जेवढा वेळ लागतो (अडीच तास) तेवढाच लागेल. मात्र घोटीहून पुढे आल्यानंतर भरवीरपासून समृद्धी महामार्ग सुरू होतो.
    यामुळे घोटी ते शिर्डी जो अडीच तासांचा वेळ लागायचा तो आता एक तासावर येणार आहे.

    ठाणे, कल्याणकरांना शिर्डी आणखी जवळ

    दक्षिण मुंबईतून ठाणे कल्याणपर्यंत येण्यासाठी एक तासांचा वेळ लागतो. पण ठाणे, कल्याणचे भाविक थेट मुंबई नाशिक हायवेवरुन दीड तासात घोटी आणि पुढे एक तासात शिर्डी असं अडीच ते तीन तासात शिर्डीला पोहोचू शकतील.

    मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत?

    शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सिन्नर ते कसारा टप्प्यात १२ बोगदे आणि १६ छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल. समृद्धीवरील उर्वरित १०२ किमीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर शिर्डीला जाण्यासाठी लागणारा वेळ निम्म्याने कमी होईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *