• Wed. Mar 11th, 2026
    भाजप-शिंदे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? एकनाथ शिंदेंकडून लोकसभेसाठी इतक्या जागांची मागणी

    मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये याच मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २०१९ मध्ये लढवलेल्या २३ पैकी २२ जागांवर दावा सांगितला जाऊ शकतो. यावर पक्षविस्ताराच्या बाबतीत कायम आक्रमक असलेला भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती.या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, लोकसभेच्या २२ जागा लढवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. यापैकी १३ खासदार हे सध्या शिवसेनेसोबत (शिंदे गट) आहेत. तर उर्वरित खासदार ठाकरे गटासोबत असून या जागांचा आढावा घेतला जाईल. यानंतर त्याठिकामी उमेदवार उतरवण्याच्यादृष्टीने तयारी केली जाईल. लोकसभेच्या या २२ जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले.

    तसेच खासदारांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी १३ विद्यमान खासदारांसोबत चर्चा केली. या जागा पुन्हा जिंकण्यासाठी काय करावे लागेल, यावर चर्चा झाली. लोकसभेच्या या १३ जागांसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी संबंधित मतदारसंघांमधील भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची बैठक होईल, असेही सांगण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या सर्व लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याचा निर्णय झाल्याची माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

    Mumbai News: लोकसभा निवडणुकीसाठी हुकमी एक्क्यांचे मन वळवणार, आमदारांना उतरवणार खासदारकीच्या लढाईत

    गेल्या जुलै महिन्यात शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट असल्याचे पत्रही दिले होते. यानंतरच्या काळात वायव्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली होती. आता उद्धव ठाकरे गटाकडे केवळ सहा खासदार उरले आहेत.

    नाशिकवर आता नंदुरबारचा कंट्रोल! गिरीश महाजनांचा पत्ता कट, भाजप प्रभारीपदाची सूत्रे कुणाच्या हाती?

    भाजप आणि शिवसेना यांनी २०१९ साली युतीमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप-शिवसेनेने महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपने २५ जागा लढवून २३ जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी १८ जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेच्या अनुक्रमे २५ आणि १९ जागा लढवल्या होत्या. तर चार जागांवर घटकपक्षाचे उमेदवार उभे होते.

    शिंदे गटात येण्याची ऑफर; राऊतांचा गौप्यस्फोट

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *