करमुसे यांना केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा सहकाऱ्यांचा बाबतीत ९० दिवसांत तपास करून पुन्हा अतिरिक्त चौथे आरोपपत्र ठाणे पोलिसांनी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी आव्हाड यांच्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यात १२० (ब) आणि ३६४ (अ) अशी कलम लावण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा खुलासा केलेला नसून सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन काब्दुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही.
करमुसे प्रकरणातील घडामोडी
> अनंत करमुसे याने डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील मॉर्फ केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकले
> एप्रिल २०२० मध्ये अभियंता करमुसेना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मारहाण
> तत्कालीन गृहनिर्माणमंत्री डॉ. आव्हाड यांच्या अंगरक्षक वैभव कदम यांच्या नावाचा समावेश
> ५ एप्रिल, २०२० रोजी वर्तकनगरमध्ये गुन्हा दाखल
> आक्षेपार्ह पोस्ट-अभियंता अनंत करमुसे यांनाही समन्स पत्र बजावले
> वर्तकनगर पोलिसांची डॉ. आव्हाड याना अटकेस टाळाटाळ
> तब्बल दीड वर्षानंतर १४ आक्टोबर २०२१ ला डॉ. आव्हाड याना अटक आणि सुटका
> करमुसे मारहाण प्रकरणाची सीबीआय चौकशीची उच्च न्यायालयात मागणी
> उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला
> करमुसे यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला
> ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञा पत्र दाखल केल्याचा डॉ. आव्हाड यांचा दावा
> २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ९० दिवसात पुन्हा चौकशी करून आरोपपत्र दाखल निर्देश दिलें
> सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर डॉ.आव्हाड यांचा अंगरक्षक वैभव कदम लोकल ट्रेन खाली सापडल्याची घटना
> व्हाट्सअप स्टेटसमध्ये ‘मी आरोपी नाही’ तणावाखाली आत्महत्या केल्याची चर्चा
> सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने अखेर ठाणे पोलिसांनी सादर केले ५०० पानांचे आरोपपत्र