म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे अडचणीत आलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. अतिक अहमदप्रमाणे माझे बरेवाईट केले जाऊ शकते असे सांगतानाच त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त फणसळकर यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी विशेष पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.भ्रष्टाचार आणि खंडणी प्रकरणात दाखल गुन्ह्यांमध्ये सलग दोन दिवस पाच तास चौकशी झाल्यानंतर समीर वानखेडे हे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात हजर झाले. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. यासाठी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले असून त्यातून या प्रकरणी चौकशी करण्याची तसेच विशेष संरक्षण देण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मला आणि पत्नी क्रांती हिला मोबाइलवर तसेच समजामध्यमांवर गंभीर धमक्या येत आहेत. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यापासून या धमक्या सुरू झाल्या असून वेगवेगळी नावे, क्रमांक आणि समाजमाध्यमांवरील खाती वापरून या धमक्या दिल्या जात असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
दक्षता समितीचा ठपका
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर एनसीबीच्याच दक्षता समितीने ठपका ठेवला. आर्यनला सोडविण्यासाठी २५ कोटी मागितल्याचा आणि ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर करण्यात आला. दक्षता समितीच्या अहवालाच्या आधारे सीबीआयने समीर एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंग, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्यासह के. पी. गोसावी आणि सॅनविल डिसोझा या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून सीबीआयमार्फत या गुन्ह्याचा तपस सुरू आहे.