काल सांगोला तालुक्यातील घेर्ड येथे अशाच पद्धतीचा पहिला पेड बंदोबस्तात कार्यक्रम झाला. याच पेड बंदोबस्तासाठी आयोजकांनी जवळपास सव्वा पाच लाख रुपये भरून १०० पोलीस कर्मचारी आणि ६ अधिकारी असा बंदोबस्त ठेवला होता. गौतमीच्या कार्यक्रमात होणारा दंगा, कार्यक्रम पाहायला आलेल्या महिला प्रेक्षकांना होणार त्रास आणि पोलिसांच्या समोर वारंवार उभा राहत असलेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही एक अलिखित अट कार्यक्रमाला परवानगी देताना ठेवण्यास सुरुवात केली आहे.
सांगोला तालुक्यातील घेरडी या गावातील कार्यक्रमापासून याची सुरुवात सुरु झाल्याने या आयोजकांना १०० पोलीस कर्मचारी आणि ६ अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी तब्बल सव्वा पाच लाख रुपये भरून गौतमीचा कार्यक्रम ठेवावा लागला आहे. मात्र यामुळे गौतमीचा कार्यक्रम शांततेत होत असून आमच्या कार्यक्रमाला २५ टक्के महिला आल्याने त्यांनाही कार्यक्रम बघता आल्याचे आयोजक सांगतात.
घेरडी येथे रासपचे नेते आबा मोठे यांच्या वाढदिवसासाठी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अगदी आपल्या सहकार्याला शुभेच्छा देण्यासाठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील उपस्थित होते. मात्र, आता सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम करताना गर्दीनुसार पोलीस बंदोबस्त नेमताना पेड बंदोबस्ताचे पैसे भरून कार्यक्रम करावा लागण्याची शक्यता आहे. यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिल्याने आयोजकांच्या खिशाला जादाची कात्री लागू शकणार आहे, याची जाणीव गौतमीला देखील आहे. त्यामुळेच तुम्ही कार्यक्रमासाठी दुरून येता तर शांतपणे कार्यक्रम पाहा आणि आनंद घ्या, असे आवाहन गौतमीला आपल्या चाहत्यांना करावे लागत आहे. सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी कार्यक्रमाला १०० पोलीस आणि ६ अधिकाऱ्यांचा पेड बंदोबस्त होता अशी माहिती दिली.
गौतमी पाटीलनं चाहत्यांना शांततेत कार्यक्रम पाहण्याचं आवाहन केलं असून राडा झाल्यानं बदनामी होत असल्याचं म्हटलं आहे.
असे असले तरी आज गौतमीची महाराष्ट्रात खूप मोठी क्रेज आहे. आता सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम घेताना गौतमी पाटील आणि तिच्या टीमचे मानधन, तिच्या व्हॅनिटी व्हॅनचा खर्च , कार्यक्रमाचा गले लठ्ठ खर्च याच्या सोबत आता पोलीस बंदोबस्तासाठीचा लाखो रुपयाचा खर्च वाढल्याने आता केवळ बड्या आयोजकांना गौतमीचे कार्यक्रम खिशाला परवडू शकणार आहेत. त्यामुळे गौतमी पाटील आणि तिच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच कडू बातमी ठरणार आहे . अर्थात हे सर्व गौतमीच्या कातिल अदा आणि चाहत्यांचा राड्यामुळं घडल्याच्या चर्चा आहेत.