• Thu. Jun 11th, 2026
    राम शिंदे म्हणतात, तुमची आणि पवारांची युती; सुजय विखे पाटलांचं सणसणीत उत्तर

    अहमदनगर : जामखेड बाजार समितीचे उपसभापतीपद आमच्याकडेच येईल असा विश्वास होता. मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधात काम केले, असा आरोप करुन कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची छुपी युती आहे, असा सनसनाटी दावा आरोप भाजपचे प्रवक्ते प्रा. राम शिंदे यांनी केला होता. शिंदे यांच्या टीकेला आता खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.सुजय विखे पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्र या गोष्टीचा साक्षीदार आहे की गेल्या तीस वर्षांपासून आमच्या परिवाराचा पवार कुटुंबियांशी राजकीय संघर्ष सुरू आहे. इंटरनेवर शोध घेतला तरी याची बरीच विश्लेषणेही तुम्हाला मिळतील,’ अशा शब्दांत विखे पाटील यांनी छुप्या युतीचा आरोप फेटाळून लावला. सोबतच पवार कुटुंबियांशी असलेल्या राजकीय वैरासंबंधीही प्रथमच स्पष्टपणे भाष्य केले आहे.

    जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांमध्ये हा वाद सुरू झाला आहे. प्रा. शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘शिंदे यांच्या मनात काय नाराजी आहे, हे सांगता येणार नाही. त्यांनी पक्षाकडे तक्रार केली असेल तर पक्ष श्रेष्ठी दोघांनाही बोलावून घेतील. तेथे आम्हीही बाजू मांडू. निवडणुकांमध्ये अशी थोडीफार नाराजी होतच असते. नंतर चर्चेतून प्रश्न सुटतात’.

    “मोठ्या पक्षांत असे प्रकार होतच असतात. मात्र, महाराष्ट्र या गोष्टीचा साक्षीदार आहे की, गेल्या तीस वर्षांपासून विखे पाटील परिवाराचा पवार कुटुंबियांशी राजकीय संघर्ष सुरू आहे. याबद्दलची विश्लेषणेही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. माझे आजोबा कै. बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला हा संघर्ष मी लढविलेल्या मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे विखेंनी पवारांना पाठिंबा दिला, यावर जामखेडमध्ये आणि नगर जिल्ह्यातही कोणी विश्वास ठेवणार नाही”, असंही राम शिंदे म्हणाले.

    “काही प्रक्रिया झाल्या असतील, त्यावरून शंका निर्माण होऊ शकते. या शंकेचे निरसन करणे ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या नेत्यांसमोर मांडू. मीडियाच्या माध्यमातून त्यावर चर्चा करणे संयुक्तिक नाही. शिंदे यांच्या मनात ही भावना नेमकी कशामुळे निर्माण झाली, हे समजून घेतले जाईल. चर्चेतून तो प्रश्नही सुटेल”, असंही शिंदे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed