• Sat. Jun 6th, 2026
    मध्यरात्री पुण्याहून रिटर्न येताना टिप्परची जोरदार धडक; दोघा जीवलग मित्रांचा जागीच अंत

    सातारा : आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर तांबमळा (फरांदवाडी) या ठिकाणी मध्यरात्री भरधाव वेगात जाणाऱ्या एका टिप्परने दुचाकीस्वारांना जोरात धडक दिली. या धडकेत फलटणमधील दोन तरुण जागीच ठार झाले. दोन्ही कुटुंबातील कर्ते पुरुष असून त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. या अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघातात ठार झालेले दोघेही जिवलग मित्र होते.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेट क्रं. एमएच ११ सीपी ४७७८ वरून अमिर ताजुद्दीन शेख (वय ३२, रा. शुक्रवार पेठ फलटण) आणि गणेश सुनिल लोंढे (वय ३५, रा. मंगळवार पेठ, फलटण) हे मध्यरात्री १२ वाजता पुण्याहून फलटणकडे येत होते. तांबमळा येथील गुरू हॉटेलच्या पुढील बाजूस टाटा कंपनीच्या दहाचाकी टिप्परने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, टीप्परने मोटारसायकल तब्बल १०० फूट फरफटत नेली. या अपघातात बुलेट गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आणि बुलेटवरील दोघेही युवक जागीच ठार झाले.

    मविआच्या लोकसभा निवडणूक समितीत संजय राऊतांचं नाव फिक्स, दुसरा नेता कोण असणार, उद्धव ठाकरे कुणाला संधी देणार?

    अमिर शेख आणि गणेश लोंढे हे दोघेही कुटुंबातील कर्ते होते. त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमिर शेख हा बिर्याणी हाऊस चालवत होता, तर गणेश लोंढे याचा चायनिजचा गाडा होता. दोघांचाही मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. सदर अपघात हा टिप्पर चालकाच्या चुकीमुळे झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत असून चालकावर आणि व्यवस्थापकाविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी अनेकांकडून होत आहेत.

    दरम्यान, अपघातस्थळावरून काही मिनिटाच्या अंतरावरून पोलीस जीप येत होती. त्यांनी तातडीने टिप्पर चालकाला ताब्यात घेतलं. अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed