राहुल नार्वेकर म्हणाले, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना उशीर केला जाणार नाही पण निर्णय घेण्याची घाई देखील करुन चालणार नाही. पक्ष कुणाचा हे ठरविताना निवडणूक आयोगाला २-३ महिने लागले आणि शिवसेनेच्या याचिकांवर निकाल द्यायला सर्वोच्च न्यायालयाला १० महिने लागले, हे लक्षात घ्यावं लागेल, असं राहुल नार्वेकर यांनी सूचकपणे सांगितलं.
शिवसेना पक्षाचं मूळ संविधान जुलैमध्ये होतं ते निकाल देताना ग्राह्य धरण्यात यावं, असं न्यायालयाने अध्यक्षांना सूचित केलं आहे. यावर अध्यक्ष म्हणाले, निवडणूक आयोगाकडे पक्षाने जी प्रत सोपावलेली आहे, ती आम्ही मागवून त्याच अभ्यास करु. त्या तरतुदींनुसार पक्षात निवडणुका झाल्या आहेत का? त्या संविधानात दिलेल्या तरतुदींनुसार पक्षाचं कार्य होतं का? निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत, त्यानुसार पक्ष चालतो का? असे विविध कंगोरे तपासले जातील, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.
पुढे बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, न्यायालयानं हा निर्णय संविधानिक शिस्त कायम ठेवली आहे. कार्यकारी मंडळ, विधीमंडळ आणि न्यायमंडळ तिघांनाही संविधानानं आपापल्या क्षेत्रात राहून काम करण्याचे आदेश दिले. कोणीही एकमेकांच्या क्षेत्रात कार्याशिवाय हस्तक्षेप करु नये, असं संविधानात नमूद करण्यात आल्याप्रमाणे न्यायालयाने या सर्व बाबी लक्षात घेऊन अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवले. मी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो.”