त्यामुळे त्यांनी कोपरगाव येथे जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावरील टोल नाका व्यवस्थापनाशी संपर्क केला असता तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. मग टोलनाका व्यवस्थापनाने ही रक्कम चोरली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे संबंधिताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
तक्रार केल्यावर पैसे परत मिळतील, पण जर त्याने तक्रार केलीस नसती तर…
समृध्दी महामार्गाचे टोल वसुलीच्या व्यवस्थापनाचे काम फास्टगो इन्फ्रा या प्रायव्हेट कंपनीला देण्यात आले आहे. राजेंद्र खिलारी यांची गाडी घरी असूनही मोबाईलमधून टोलचे पैसे कसे कट झाले याबाबत शिर्डी जवळील कोपरगाव येथील टोल नाक्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी सदरचे पैसे हडस पिंपळगाव इथून कट झाले असून तेथे चौकशी करावी असे म्हटले आहे. तसेच तक्रार केल्यावर पैसे परत मिळणार असल्याचे देखील म्हटले आहे.
तसेच एमएसआरडीसीचे टोलचे कामकाज बघणारे विजया शेनोए या महिला अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता जोपर्यंत तक्रारदार तक्रार दाखल करत नाही, तोपर्यंत आम्ही याबाबतची माहिती देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
पण समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता पैसे कापतात कसे? वाहन जर घरी उभं असेल तर पैसे कट करण्याचा संबंध काय? तक्रार केल्यावर पैसे परत मिळणार असे म्हटले आहे. परंतु सर्वच प्रवाशी तक्रार करतात का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून टोल व्यवस्थापनाचा हा सावळा गोंधळ थांबवावा अशीच मागणी प्रवाशी नागरिकांकडून केली जात आहे.
