शिंदे-फडणवीस सरकारवर अजितदादांचं टीकास्त्र
सध्याचे हे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून बदल्यांसाठी रेट ठरला आहे, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला. सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून एका कार्यकर्त्याने मला दाखविलेला फोटो पाहून धक्काच बसला. मनगट तोडण्याचे काम जर कोण करीत असेल तर सरकार काय झोपा काढतंय का? असा प्रश्न त्यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदेंवर आसूड
मुख्यमंत्री गावाकडे शेती करतात असं सांगतात. झाडे तीच दाखवतात, असं सांगत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री केली. तीन दिवस गावी राहून ६५ फाईल्सचा निपटारा केला असं सांगतात, मात्र तीन हजार फाईल्स पेंडींग आहे, त्या बघा… असा सल्ला देताना मी एवढ्या फाईल्स ३ तासात निपटवतो, असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला.
अपयश आलेल्यांनी खचू नका, विजय मिळालेल्यांनी मातू नका
बाजार समितीच्या निवडणुकीत आपण सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी कमी पडलो. पण, अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाचा उन्माद करायचा नाही. या निवडणुकीत १४७ पैकी ८० ठिकाणी महाविकास आघाडीच्या स्थानिक पॅनेलची सत्ता आली, तर भाजप व सत्ताधाऱ्यांना ४७ ठिकाणी तर ३८ ठिकाणी सर्वपक्षिय आघाड्या निवडून आल्या आहेत. या निकालातून आताच्या राज्यकर्त्यांना जनतेने नाकारल्याचे स्पष्ट आहे, अशी टीका केली.
हा यशवंतरावांचाच सातारा जिल्हा आहे का…?
कोरेगावामध्ये पोलिस निरीक्षक पोस्ट असून ही कोणी चार्ज घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. मी आणि वळेस पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. पण, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. राज्यात व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली व त्यांच्यानंतर पवार साहेब यांनी हे काम केले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे म्हटले जाते. त्यांच्या जिल्ह्यात काय चालले आहे, असा प्रश्न त्यांनी केला.
