करोना काळात साडे तीन लाखांपेक्षा अधिक लोकांच्या अन्नाचा प्रश्न मी मार्गी लावला आहे. युवकांचे अनेक प्रश्न मी माझ्या कारकिर्दीत सोडवले आहेत. फक्त निवडणुकीपुरता काम करण्याचा माझा स्वभाव नाही तर कायम लोकसांसाठी झगडत राहणं ही माझी सवय आहे त्यामुळे या लोकसभा पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांची भावना जपण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीतील कसबा येथील वातावरण आजही तसेच आहे. आणि त्यामुळे मी ही पोटनिवडणूक लढवावी अशी लोकभावना असेल तर जागा काँग्रेसची असली तरी राष्ट्रवादी देखील या जागेची मागणी करू शकते.
२५ लाख लोकांपर्यंत पोहोचणारा मी एक कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य लोकांचा माझ्या कामावर, माझ्यावर विश्वास आहे. गणेश मंडळ, युवकांचे प्रश्न, सार्वजनिक वाहतुकीचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, शिक्षण मंडळ, पीएमपीएमएल, पालिका कर्मचारी या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच सर्वात पुढे उभा राहिलेलो आहे. त्यामुळे या सगळ्यांशी माझं एक वेगळं नातं जोडलेले आहे. त्यामुळे मी लोकांतील उमेदवार असल्याने ही पोटनिवडणूक मी लढणारच असा मानस दीपक मानकर यांनी बोलून दाखवला आहे.
दरम्यान, भाजपकडून देखील मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी, संजय काकडे, स्वरदा बापट, जगदीश मुळीक यांचं नावं चर्चेत असल्याने भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील प्रशांत जगताप यांच्या सोबतच दीपक मानकर यांनी स्वतः या जागेवर दावा ठोकला आहे. विशेष म्हणजे दीपक मानकर हे शरद पवार यांच्या मर्जीतील नेते मानले जात असल्याने राष्ट्रवादीमध्ये लोकसभेच्या या जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पुण्यातील राजकारण कमालीचं तापलं आहे.
कोण आहेत दीपक मानकर ?
दीपक मानकर यांनी १९८८ पासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते १० वर्ष महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. २००७ ला महापालिका निवडणूक लढवून नगरसेवक झाले. पहिल्या वेळेस स्वीकृत नागरवेक पदासह ४ टर्म नगरसेवक ते राहिले आहेत. मानकर पुणे महापालिकेत उपमहापौर राहिले आहेत. त्यांनी १० वर्ष शिक्षण मंडळावर काम केलं आहे. २०१४ ला विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. सुरेश कलमाडी, गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुण्यात मोठे काम केलं. काँग्रेसमध्ये असले तरी शरद पवार यांच्या मर्जीतील नेता म्हणून ओळख होती. दीपक मानकर यांचा पुण्यात दांडगा जनसंपर्क असून युवकांच्या, गणेश मंडळांच्या प्रत्येक प्रश्नावर सर्वात पुढे येऊन लढणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकांतील माणूस म्हणून परिचित आहेत.