म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मार्च महिन्यात शेतपिकांचे प्रचंड नुकसान केल्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा अवकाळीच्या भीतीचे मळभ दाटले आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार असला, तरी सतर्क राहण्याच्या सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. शहरात सध्या कमाल तापमान ३५.१ अंशांवर स्थिर असून, शुक्रवारी-शनिवारी दुपारी किंवा सायंकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.नाशिकमध्ये चार दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत असून, दुपारी ७.५ किमी प्रतितास वेगाने उष्ण वारे वाहत आहे. बुधवारी (दि.५) सकाळपासून उष्ण वारे वाहत असताना सायंकाळी साडेचारनंतर काहीसे ढगाळ वातावरण जाणवले. विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचे ढग दाटल्याचा काहीसा परिणाम मध्य महाराष्ट्रातही जाणवणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले. शहराचे किमान तापमान १९ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. तर, कमाल तापमान ३५ अंशांवर स्थिर असून, अवकाळी पावसामुळे तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये गुरुवारी (दि. ६) तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मध्यम स्वरूपात काही ठिकाणी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली असून, अवकाळीमुळे पुन्हा आरोग्याच्या तक्रारी वाढण्याचाही अंदाज आहे.
…म्हणून, पुन्हा अवकाळी
भारतातील पश्चिम आणि दक्षिण-पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या एकत्रीकरणामुळे अवकाळी पावसाची स्थिती पुन्हा उद्भवली आहे. या कोनीय स्थितीमुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे दमट वारे वाहत असून, त्याचा काहीसा परिणाम मध्य महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे.
पुणेकर ऐकत नाय! हापूस परवडेना म्हणून थेट आंबा EMIवर, विक्रेत्याची भन्नाट कल्पना