• Sat. Sep 21st, 2024
हेमामालिनींच्या स्वप्नात आलेले अमरावतीचे हनुमानजी, जागृत देवस्थानाची सर्वदूर ख्याती…

अमरावती: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या सिने अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमामालिनी या एक दिवस अचानक अमरावती जिल्ह्यातील जहागीरपूर येथील जागृत श्री महारुद्र मारुती यांच्या दर्शनाला आल्या आणि सर्व महाराष्ट्रात एकच चर्चेला उधाण आलं. हनुमंत रायाच्या दर्शनाला चक्क अभिनेत्री हेमामालिनी आल्या, कारण त्यांना जाहागीरपूर येथील हनुमंताने स्वप्नात दर्शन दिलं होतं. विशेष म्हणजे हेमामालिनी या १९८९ मध्ये थेट मुंबईवरून जहागीरपूरला आल्या होत्या. त्यावेळी या मंदिरात येण्यासाठी अमरावती ते कौंडण्यपूर मार्गावरून आत मध्ये येण्याचं मार्ग हा चिखल मातीने भरलेला होता. हेमा मालिनी यांनी या रस्त्यासाठी निधी देण्याचे जाहीर करून त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना हा रस्ता बांधण्यासाठी विनंती केली होती. राज्य शासनाने या रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे यासाठी संपूर्ण निधी हेमामालिनी उपलब्ध करून दिला होता. या रस्त्याचे काम पूर्ण होताच रस्त्याच्या उद्घाटनासह जहागीरपूर येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी हेमामालिनी पुन्हा एकदा १९९१ ला आल्या होत्या. मंदिरापर्यंत थेट पक्का रस्ता तयार झाल्यामुळे भाविकांना मंदिरात येणे सुविधेचे झाले. १९९५ मध्ये सिने अभिनेता मनोज कुमार हे देखील जहागीरपूर येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी येवून दर्शन घेतले होते.

Jyotiba Yatra: गुलालाने रंगला ज्योतिबा डोंगर, लाखो भाविक दाखल, रंगला चांगभलंचा गजर; यात्रेचा आज मुख्य दिवस
द्वापर युगात प्रभू श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाल्यावर बाळ कृष्णाची भेट घेण्यासाठी श्री हनुमान गेले होते. श्रीकृष्णाची भेट झाल्यावर त्यांनी रुक्मिणी मातेबाबत चौकशी केली. श्रीकृष्णांनी रुक्मिणी माता कुंडीलपूर अर्थात आताचे अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथे असल्याचे हनुमंताला सांगितले होते. त्यामुळे आई रुक्मिणीच्या दर्शनासाठी हनुमंताने कौडण्यपूर गाठले. रुक्मिणी मातेची भेट झाल्यावर मातेने त्यांना याच परिसरात थांबायला सांगितले. तेव्हापासून श्री हनुमान कौडण्यपूर लगत असणाऱ्या जहागीरपूर येथे स्थानपन्न झालेत, अशी आख्यायिका सांगितली जाते. साडे चारशे वर्षांपूर्वी या परिसरात महरुद्र मारुतीचे हनुमानाचे वास्तव्य असल्याचे समोर आल्यावर या ठिकाणी जमिनीतून प्रकटलेल्या जागृत हनुमानाचे मंदिर उभारण्यात आले आहे.

जहागीर पासून अगदी हाकेच्या अंतरावर अमरावती कौडण्यपूर मार्गावर मार्डा हे गाव आहे. सुमारे साडे चारशे वर्षांपूर्वी या गावातील नानासाहेब देशमुख यांचे कौडण्यापूर लगतच्या जंगल नजिक १४०० एकर शेत होते. या शेतात काम करणाऱ्या मजुरांना एक दिवस गवत कापत असताना अचानक जमिनीत विळे खूपसले असता रक्त लागलेले दिसले. साप विंचू तर मारला गेला नसावा म्हणून मजुराने बघितले तर त्या ठिकाणी काहीही आढळून आले नाही. काहीही नसताना विळ्याला रक्त लागलेले पाहून मजूर आश्चर्यचकित झाले. त्यानी हा संपूर्ण प्रसंग गावात जाऊन नानासाहेबजी देशमुखांना सांगितला. यानंतर नानासाहेब देशमुख यांनी शेतात येऊन त्या ठिकाणी खोदकाम केले. त्यावेळी जमिनीतून श्री हनुमानाचा भव्य मुखवटा बाहेर निघाला. देशमुख यांच्या शेतात हनुमान प्रगटल्याची माहिती पंचक्रोशीत पसरली अनेक जण या ठिकाणी दर्शनासाठी आले.

नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

त्यावेळी हनुमानाच्या मूर्तीवर लाकडी छत उभारण्यात आले आणि हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी होऊ लागली. हळूहळू मंदिर परिसरात जहागीरपूर नावाचे गाव वसले. आज येथे स्वयंभू हनुमानाचे भव्य मंदिर उभारण्यात आले असून जागृत असणाऱ्या या हनुमानाच्या दर्शनासाठी अमरावती जिल्ह्यासह लगतच्या वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि मध्य प्रदेशातून देखील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.

विदर्भातील अनेक कुटुंबीयांसह मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक कुटुंबीयांचे जहागीरपूर येथील जागृत हनुमान हे कुळदैवत असल्याची माहिती मंदिरातील पुजारी परमानंदजी पांडे महाराज यांनी महाराष्ट्र टाइम्स सोबत बोलतांना दिली. पुढे बोलताना पांडे महाराज म्हणाले की, जागीरपूर येथील जागृत हनुमान हे भाविकांच्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक सिने अभिनेते येऊन गेलेत.

Kolhapur Breaking: पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मूर्तीशी छेडछाड केली; श्री पूजकांचा गंभीर आरोप
श्री हनुमानाचे जागृत स्थान असलेल्या या ठिकाणी दर शनिवारी आणि मंगळवारी यात्रेचे स्वरूप असते. या दोन्ही दिवशी शेकडो भाविक श्री महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी येतात. इतर दिवशी देखील अनेक भाविक जहागीरपूरला येतात. आज हनुमान जयंतीला भव्य उत्सव जहागीरपूर येथील श्री महारुद्र मारुती मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री हनुमानाच्या दर्शनासाठी दररोज येणाऱ्या शेकडो भाविकांसाठी मंदिर संस्थेच्या वतीने प्रत्येक दिवशी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. भाविकांसाठी निवासासह उत्तम असे भोजन कक्ष उभारले आहेत. विविध वृक्ष आणि हिरवळीने प्रफुल्लीत अशा बागेमध्ये अनेक भाविक स्वतः देखील स्वयंपाक करतात. जागृत असणाऱ्या श्री महारुद्र मारुती मंदिराचे वैभव हे शेगाव आणि शिर्डी सारखेच व्हावे अशी इच्छा पांडे महाराजांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed