यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गिरीश बापट आणि मी आमदार निवासामध्ये १५ वर्षे एकत्र राहिलो होतो. त्यावेळी गिरीश बापट आमच्यासाठी जेवण बनवायचे. त्यांच्याकडे माणसं जपण्याची कला होती. अगदी साध्या शिपायापासून मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. गिरीश बापट हे अत्यंत हजरजबाबी होते, समोरच्याला न दुखावता आपला मुद्दा पटवून देण्याचे कसब त्यांच्याकडे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बापट दिल्लीला निघाले होते, पण मी महाराष्ट्रात थांबायला सांगितलं: देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा देताना २०१४ साली घडलेला एक किस्सा सगळ्यांना सांगितला. गिरीश बापट यांना खासदार होऊन दिल्लीला जाण्याचा प्रचंड इच्छा होती. २०१४ साली ते दिल्लीला जाणारही होते. मात्र, त्यावेळी मीच गिरीश बापट यांना अडवले होते. भाऊ आता राज्यात आपलं सरकार येणार आहे, तुम्ही दिल्लीला कशाला जाता, असे मी त्यांना म्हटले. त्यामुळे गिरीश बापट यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नाही. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी राज्यात मंत्री म्हणून काम केले. तेव्हा ते म्हणाले की, बरं झालं इथे ही चांगले काम करता येत लोकसभेत गेलो असते तर हा अनुभव मिळालाच नसता. मात्र, २०१९ साली बापटांनी दिल्लीत जाण्याचे मनाशी पक्के केले होते. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते जिंकून आले, त्यांना दिल्ली मानवली की नाही, यावर मी आता काही बोलू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.