मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील आज श्रीगोंद्यात दाखल होणार असल्याने शहराचे वातावरण तापले आहे. जरांगे पाटील यांच्या मुक्कामासाठी बाजारतळ परिसर सज्ज झाला असून, त्यांच्या सभेसाठीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी मराठा बांधव प्रचंड उत्साहित आहेत. तालुक्यासह शेजारील जिल्ह्यांतूनही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही पूर्ण तयारी केली आहे. गर्दी, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान लक्षात घेऊन तब्बल ३५० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी आणि दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.