• Tue. Sep 15th, 2026

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीत एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादावेळी नीरज किशन कौल यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकाधिकारशाहीचे आरोप केले. तसेच राजकीय पक्षात फूड पडली नाही, असा युक्तिवाद कौल यांनी केला. यावेळी पक्षाच्या घटनेत लोकशाही व्यवस्था असावी, असे मुद्दे कौल यांनी मांडले. यावेळी त्यांनी पक्ष घटनेतील लोकशाहीवर भाष्य करताना अर्जुन सिंग केसचा दाखला दिला. त्यामुळे शिवसेनेच्या सुनावणीत आता मोठा ट्विस्ट आला आहे.

नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर मंगळवारी (15 सप्टेंबर) सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी आज युक्तिवाद केला. शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांचे वकील युक्तिवाद करत आहेत. शिंदेंचे वकील नीरज किशन कौल यांनी आजच्या सुनावणीत काही महत्त्वाचे दावे आणि आरोप केले आहेत.

नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद काय?

मागच्या सुनावणीवेळी मी 1999च्या घटनेबद्दल माहिती दिली होती. शिवसेना प्रमुखाची नेमणूक ही प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर होते, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या घटनेत नेमकं काय लिहिलं आहे याबाबत कौल यांनी कोर्टाला सांगितलं.

कौल यांचा पक्षप्रमुखपदाबाबत मोठा युक्तिवाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधननंतर 2013 ला पक्षप्रमुख पद गोठवलं होतं. पक्षप्रमुखपद 2018 च्या घटनेनुसार चुकीचं आहे. ते पक्षाच्या घटनेला धरुन नव्हतं. पक्षप्रमुखपद 2018 मध्ये आलं हा त्यांचा युक्तिवाद चुकीचा आहे, असा मोठा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला. शिवसेना प्रमुखपद 2013 मध्ये गोठवलं तेव्हाच पक्षप्रमुखपद निर्माण झालं होतं. त्यामुळे पक्षप्रमुखपद 2018 ला आले हा त्यांचा यु्क्तिवाद चुकीचा आहे, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

एकनाथ शिंदेंनी आपलाच पक्ष खरा शिवसेना असा युक्तिवाद का केला?

शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात असलेल्या पक्षाशी युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता. त्यामुळे पक्षात एकप्रकारे असंतोष निर्माण झाला होता. त्याआधारेच एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष मूळ शिवसेना असल्याचा दावा केला, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवताना विधीमंडळातील आमदारांची संख्या पाहणं गरजेचं आहे, असं याआधी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रकरणात विधीमंडळातील आमदारांची संख्या निवडणूक आयोगाने लक्षात घेतली, असा युक्तिवाद शिंदेंचे वकील नीरज किशन कौल यांनी केला.

पक्षातील बदल निवडणूक आयोगाला सांगितले नसल्याचा दावा

पक्षाची नवी घटना निवडणूक आयोगात सादर केलेली नाही. पक्षाचं स्ट्रक्चर, नवीन प्रतिनिधीची माहिती आयोगात दिलेली नाही. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत जे बदल करण्यात आले होते त्याची माहिती निवडणूक आयोगात दिली गेली नव्हती, असा मोठा युक्तिवाद कौल यांनी केला.

ठाकरेंवर गंभीर आरोप

उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपवून सर्व अधिकार स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पक्षात असंतोष निर्माण झाला, असा युक्तिवाद कौल यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकार मान्य केले होते. 1999 सालची घटना निवडणूक आयोगासमोर आणल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यामध्ये काही बदल सूचवले होते. ते बाळासाहेब ठाकरे यांनी मान्य केले होते. 2018 साली उद्धव ठाकरे यांनी त्या घटनेत बदल केला जो अवैध होता, असा आरोप कौल यांनी आपल्या युक्तिवादात केला.

‘पक्ष देताना 3 गोष्टी बघितल्या जातात’, कौल यांचा युक्तिवाद

संवंधिनात लोकनियु्क्त आणि लोकशाही व्यवस्था असावी, असं सांगण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. पक्ष देताना 3 गोष्टी पाहिल्या जातात. पक्षाची घटना, ऑर्गनायझेशन स्ट्रक्टर, विधीमंडळ संख्या पाहतात. कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगाला व्यापक आणि पूर्ण अधिकार आहेत. त्यामुळेच त्यांनी 2018 ची घटना योग्य नव्हती, असा निर्णय दिला. पण आयोगाने घेतलेल्या निर्णयावरुन आयोगाने अभूतपूर्व केल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

‘विधीमंडळ फुटीपलीकडे जाऊन विचार करणं आवश्यक’

“चिन्हांच्या आदेशानुसार मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवणं आवश्यक आहे. राजकीय पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही”, असा युक्तिवाद कौल यांनी केला. “निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी आम्ही ठराव मंजूर केले आहेत. विधीमंडळ पक्षात फूट पडल्याने निवडणूक आयोगाकडे गेलो हे म्हणणं चुकीचं आहे. आमचं म्हणणं तसं कधीच नव्हतं. विधीमंडळ पक्षातील फुटीपलीकडे जाऊन सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे. या सर्वांचे पडसाद राजकीय पक्षापर्यंत पोहोचू शकतात. संपूर्ण राजकीय पक्षाचा विचार केला पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे”, असा मोठा युक्तिवाद कौल यांनी केला.

“पक्षात दोन गट तयार झाले कारण निवडणुकीपूर्वी असलेली युती तोडली. निवडणुकीआधीची वैचारिक युती बदलून निवडणुकीनंतर दुसऱ्या पक्षासोबत सरकार स्थापन केलं गेलं. पक्षाच्या मुल्यांविरोधात असणाऱ्यांसोबत सत्ता स्थापन केली गेली. भ्रष्ट पक्षांसोबतच्या युतीमुळे कार्यकर्त्यांना अपमानजनक प्रश्नांना सामोरं जावं लागत होतं”, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला.

कौल यांच्याकडून अर्जुन सिंग केसचा दाखला

अर्जुन सिंग केसमध्ये पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा मांडला आहे.पक्षात पक्षांतर्गत लोकशाही असणं गरजेचं आहे, असा महत्त्वाचा मुद्दा नीरज किशन कौल यांनी आपल्या युक्तिवादात मांडला. यानंतर आजची सुनावणी संपली. आता पुढची सुनावणी उद्या बुधवारी (16 सप्टेंबर) होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.