• Fri. Sep 4th, 2026

केरा-मणदुरे आणि तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी प्रथम स्थानिक शेतकऱ्यांना द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 4, 2026

सातारा, दि. ४ : केरा-मणदुरे आणि तारळी उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी वितरण करताना प्रथम स्थानिक शेतकऱ्यांना आणि प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने पाणी दिले पाहिजे. स्थानिक शेतकऱ्यांची गरज भागल्यानंतर उर्वरित शिल्लक पाणी इतर योजनांना द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केरा-मणदुरे आणि तारळी उपसा सिंचन योजनांच्या आढावा पालकमंत्री देसाई यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोणपे यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या दोन्ही उपसा सिंचन योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून जास्तीत जास्त शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे निर्देश देऊन पालकमंत्री देसाई म्हणाले, सिंचन योजनेची चाचणी लवकरात लवकर घेऊन पहिला टप्पा नोव्हेंबरपर्यंत पोटपाटांसह सुरू करावा तर दुसरा टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा.

बैठकीत पाटण एमआयडीसीच्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्री देसाई म्हणाले, एमआयडीसीमध्ये अद्याप सुरू न झालेल्या उद्योगांना तत्काळ नोटीस पाठवावी आणि  उद्योग सुरू न करणाऱ्यांच्या जमिनी परत ताब्यात घेऊन त्यांचे फेरवाटप करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे त्यांनी सांगितले. या जमिनींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी आणि एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दौरा करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed