मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश आलं आहे. कारण राज्य सरकारने मराठा समजासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ओबीसी समजाला ज्या सवलती आहेत त्याच सवलती मराठा समाजालादेखील मिळतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या विरोधात जात पडताळणी समितीने विरोधात निर्णय दिला त्यांचा प्रवेश रद्द होणार नाही तर या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत प्रवेश रद्द होणार नाही आणि सरकार अशा विद्यार्थ्यांचे ईडब्लूएसमधून पैसे भरणार, असा निर्णय सरकारने घेतल्याचं आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. राज्य सरकारच्यावतीने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज अंतरवली सराटी गावात जावून मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या? याची यादी सांगितली. तसेच त्यांनी याबाबतचे पुरावे देखील जरांगेंना दाखवले. यावेळी त्यांनी काही तांत्रिक मुद्देदेखील मांडले. यावेळी त्यांनी जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगेंनी पाणी घेतलं आणि सलाईन लावण्याचं मान्य केलं, तरी सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचं म्हटलं.
राज्य सरकारकडून ‘या’ मागण्या मान्य
“मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांची संख्या 1509 इतकी होती. त्यापैकी 1373 गुन्हे मागे घेतले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या नावाप्रमाणे यादी आपल्याला देतो. जे अपात्र गुन्हे ठरले होते त्या 18 गुन्ह्यांच्याबाबतीत सरकार तुमच्या बरोबर आहे. त्याची चार्जशीट करणं पोलिसांचं काम आहे. त्याबाबत सरकार शंभर टक्के मदत करणार”, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
“मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी कक्ष स्थापन केला आहे. त्यासाठी अप्पर सचिव दर्जाचे ललितकुमार धायगुडे यांची नियुक्ती केली आहे. कक्ष अधिकारी विवेक जगदाडे, विधी अधिकारी नितीन कथोरे, कक्ष सहाय्यक अधिकारी राजेश जाधव केले आहेत. डेटा एन्ट्रीसाठी सतीश तातडे यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयाच्या बाराव्या मजल्यावर 1250 चौरस फुटाचे कार्यालय मराठा समाजासाठी दिले”, असं लाड यांनी सांगितलं.
“जात पडताळणी तातडीने देण्यासाठी वंशावळी समिती आपण केली आहे आणि तिला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे”, अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली.
“ओबीसी समाजाच्या सवलती मराठा समाजालादेखील लागू होतील. शंभर टक्के सवलती मिळणार”, अशी मोठी माहिती त्यांनी दिली.
“जात पडताळणी समितीने निर्णय विरोधात दिला तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश थेट रद्द व्हायचे. पण आता सरकारने नवा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत या प्रकरणात निर्णय लागत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार नाही. रद्द जरी झाला तरी त्याची फी ईडब्ल्यूएसमधून सरकार भरेल”, असा मोठा निर्णय झाल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली.
“सारथीसाठी गेल्यावर्षी 355 कोटी दिले होते. सारथीमध्ये जो अर्ज करेल त्याला पैसे देण्याचं प्रोव्हिजन आहे. आतापर्यंत 54 योजना आपण राबवत आहेत. आतापर्यंत 4466 लोकांनी लाभ घेतला आहे. त्याचे 15 कोटी 51 लाख रुपये सरकारने दिले आहेत. तसेच काल सरकारने 49 कोटी रुपये सारथीमध्ये वर्ग करण्याचं काम केलं आहे. त्याचा जीआर काढला आहे”, असं त्यांनी सांगितलं.
“आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात 300 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सरकारने पैसे उशिरा दिले म्हणून मराठा समाजाच्या मुलांना एनपी करायचं नाही तसं हमीपत्र बँकांना सरकारने दिलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात निधीची कमतरता भासणार नाही”, असं आश्वासन त्यांनी दिलं.
“न्यायमूर्ती शिंदे समिती संपूर्ण राज्य फिरुन कुणबी नोंदी शोधणार आहे. या समितीला मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे 3000 फुटाची जागा देऊन कार्यालय करण्याची परवानगी दिली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
“एमएसईबी, एसटी महामंडळातील नोकरींचे विषय असतील, सर्व मुलांचे प्रश्न सोडवू. सर्व मुलांना न्याय देण्याचे काम सुरु आहे. उद्यापासून हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरु होईल. येत्या 17 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रश्न सुटतील”, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
“सातारा आणि कोल्हापूर गॅझेटियरट्या मागणीबाबत मी मनोज जरांगे दादा यांना सांगितलं होतं की, आपल्या हैदराबाद गॅझेटियरच्या निर्णयाला काही नतभ्रष्ट लोकांनी कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आपल्या सर्वांच्या पाठीमागे आहे. ज्यावेळी हा निर्णय लागू केला तेव्हा राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ होते. विशेष वकील म्हणून साठे साहेबांना तिथे उभे केलं होतं. आज तेच मिलिंद साठे साहेब राज्याचे महाधिवक्ता आहेत.”
“सराफ यांना विनंती करुन स्पेशल वकील म्हणून हैदराबाद गॅझेटियसरसाठी लढण्याची विनंती केली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, हे राज्य सरकार हैदराबाद गॅझेटियर रद्द होऊ देणार नाही. मी अनेक वकिलांशी बोललो. आपल्या विरोधातील झारीतील शुक्राचार्य वाट पाहत आहेत. आपण हे गॅझेटियर दिलं तर हैदराबाद गॅझेटियरचं प्रकरण कोर्टात असताना हे गॅझेटियर कसं दिलं याविरोधात कोर्टात धावतील.”
“सातार आणि कोल्हापूरबरोबर हैदराबाद गॅझेटची चिंता करायला पाहिजे, अशी विनंती मनोज जरांगे यांना केली होती. आम्ही राज्याचे महाधिवक्तांना पत्र दिलं आणि त्याची कॉपी मी आणली आहे. त्यामध्ये आपण त्यांचं ओपिनियन मागणार आहोत की, त्याचा हैदराबाद गॅझेटवर काय परिणाम होईल. काही परिणाम होणार नसेल तर आपण तात्काळ ते लागू करु. पुढच्या 90 दिवसांच्या आत हैदराबाद गॅझेटचा निकाल आपल्याबाजूने लागेल आणि त्यानंतर सातारा आणि कोल्हापूर गॅझेट लागू करु. या पत्राची कॉपी मी इथे आणली आहे.”
“58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना प्रमाणपत्र वाटप सुरु करा. आपल्या आग्रहाखातर पाणी पितो आणि सलाईन घेतो. पण उपोषण सोडणार नाही. हैदराबाद गॅझिटियरचा जीआर आता काढा आणि तीन महिन्यांनी अंमलबजावणी करा. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सातारा आणि कोल्हापूरच्या गॅझेटियरचा जीआर काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा