• Wed. Sep 2nd, 2026

Manoj Jarange: मुंबईत गेल्यावर आझाद मैदान किंवा वर्षा बंगल्यावर जायचं नाही; मनोज जरांगेंनी मराठ्यांना सांगितला आंदोलनाचा गनिमी कावा

योगेश काकफळे, जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 3 दिवस असून आज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे. 6 सप्टेंबरनंतर राज्यातील मराठा समाजाने टप्प्याटप्प्याने मुंबईकडे कूच करावे आणि 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचावे, असे आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मात्र मुंबईत पोहोचल्यानंतर आझाद मैदान किंवा वर्षा निवासस्थानी कोणीही जाऊ नये, तसेच पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.

मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबई आंदोलनाचा प्लॅन जाहीर केला. आजपासूनच मुंबईला जाण्याचे नियोजन करा, 6 सप्टेंबरनंतर टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल व्हा आणि 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचा, असे त्यांनी सांगितले. मुंबईत पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आझाद मैदान किंवा वर्षा निवासस्थानाकडे जाऊ नये. त्याऐवजी पाहुणे, मित्र किंवा परिचितांच्या घरी थांबावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. पोलिसांनी आंदोलकांना तेथून नेले तरी घाबरू नका, तसेच पोलिसांना कोणताही त्रास देऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारसोबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला. सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी अंतरवाली सराटी येथे यावे. आमची दारे चर्चेसाठी खुली आहेत, मात्र मुंबईत चर्चा होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकडे जाण्याच्या निर्णयावरही जरांगेंनी भाष्य केले. गणेशोत्सव आमचा आहे, आम्ही गणेशोत्सवात मुंबईत जाणार, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

यावेळी मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यावरही जरांगेंनी टोला लगावला. 24 तासांत संपर्क साधू म्हणतात, मात्र माझ्याशी अद्याप कोणाचाही संपर्क झालेला नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही जरांगेंनी प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, 12 सप्टेंबरदरम्यान मुंबईत उपोषण करण्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसंच रद्द करण्यात आलेली 4 जात प्रमाणपत्रे परत द्यावीत आणि 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे आता 6 सप्टेंबरनंतर मराठा समाजाची मुंबईकडे टप्प्याटप्प्याने होणारी कूच आणि 12 सप्टेंबरपासून सुरू होणारे उपोषण , याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.