• Tue. Sep 1st, 2026

पुणे : आयटी क्षेत्राचे केंद्र मानल्या जाणाऱ्या पुण्यातील खराडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत झालेल्या वादातून आणि भांडणातून २३ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने राहत्या घरात गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, खराडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

जान्हवी पाठक (वय २३, मूळ रा. बिहार) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमृतकुमार अरुणकुमार सिंह (वय २३, रा. पहाडगंज, नवी दिल्ली) याला अटक केली आहे. तरुणीच्या उत्तर प्रदेशात राहणाऱ्या ४९ वर्षीय काकांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून खराडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी आणि अमृतकुमार हे दोघे एकमेकांना शालेय जीवनापासून ओळखत होते. त्यांचे शालेय शिक्षण एकत्रच पूर्ण झाले होते. त्यानंतर जान्हवीने राजस्थानमधून तिचे अभियांत्रिकीचे उच्चशिक्षण पूर्ण केले आणि करिअरच्या निमित्ताने ती पुण्यातील खराडी भागातील एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाली. गेल्या अवघ्या दोन महिन्यांपासून ती खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत वास्तव्यास होती. दुसरीकडे, आरोपी अमृतकुमार हा नोईडा येथील एका आयटी कंपनीत नोकरीला होता.

अमृतकुमार जान्हवीला भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच खास नोईडावरून पुण्यात आला होता. दोघेही रिव्हर डेल सोसायटीतील फ्लॅटमध्ये एकत्र होते. दरम्यान, गुरुवारी रात्री दोघांमध्ये अचानक कोणत्या तरी कारणावरून जोरदार खटका उडाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारी आणि शिवीगाळीत झाले. शुक्रवारी (२८ तारीख) दुपारी दीडच्या सुमारास अमृतकुमार काही कामासाठी इमारतीखाली गेला असता, त्याच दरम्यान जान्हवीने टोकाचा निर्णय घेत खोलीत पंख्याला गळफास लावून घेतला. अमृतकुमार परत आला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.