• Fri. Aug 28th, 2026

विकास एक व्यक्ती किंवा घटकाची बाब नसते; सर्वांच्या सहभागातूनच विकासाला खरी गती- पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 28, 2026

धुळे, दि.२७: विकास ही एका व्यक्तीची किंवा एका घटकाची बाब नसते. गावातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन, सर्वांच्या सहभागातून आणि सहकार्यानेच विकासाला खरी गती मिळते, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

ते आज शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित सार्वजनिक वाचनालयाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, सरपंच मीराबाई गिरासे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ते पी.आर. पाटील, पंचायत समितीचे शिंदखेड्याचे उपनगराध्यक्ष उदयजी देसले, गटनेते चेतन पवार, पाणीपुरवठा समितीचे सभापती दादा मराठे, युवा नेते सत्यजित सिसोदे, सुखवदचे सरपंच मधुभाऊ पाटील, तावखेड्याचे सरपंच विजय पाटील, विरदेलचे सरपंच सतीशजी भेरे, दत्तानेचे उपसरपंच राहुल बोरसे, गव्हाण्याचे उपसरपंच बटू बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजयजी खाकरे, आकडसेचे सरपंच श्री. देवीदास कोळी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, शासनाच्या माध्यमातून गल्लीपासून गावापर्यंत, गावापासून तालुक्यापर्यंत, तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत आणि पुढे राज्य व देशाच्या विकासासाठी आपण सर्वजण सातत्याने काम करीत आहोत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून निरगुडी गावात विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. आजच्या शुभप्रसंगी सार्वजनिक वाचनालयासह विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन होत असल्याचा आनंद आहे.

निरगुडी गावाने गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक एकोपा आणि एकजूट जपली आहे. गावातील ज्येष्ठ नेतृत्वाने गेल्या ४० ते ५० वर्षांपासून सर्व समाजघटकांना एकत्र ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे गावाची सामाजिक प्रतिष्ठा कायम राहिली असून सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रातही निरगुडीचे महत्त्व टिकून राहिले आहे. गावाच्या विकासामागे ही एकजूट हीच सर्वांत मोठी ताकद असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रत्येक विधानसभा निवडणुकीत निरगुडी गावाने एकत्रितपणे विकासाची भूमिका घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी गावात काही मिनिटांचा वेळ मिळत असला, तरी त्यानंतरची पाच वर्षे गावाच्या विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी असतात. गावातील सर्व जाती-धर्मांचे नागरिक आपापसातील मतभेद बाजूला ठेवून गावाच्या हितासाठी एकत्र येतात. लोकप्रतिनिधींच्या पाठीशी विकासाच्या भूमिकेतून उभे राहतात. त्यामुळेच गावातील विकासकामांना सातत्याने गती देता आली आहे.

निरगुडीच्या विकासकामांना प्राधान्य

निरगुडी गावाने विकासाची मागणी केल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. गावाच्या विकासासाठी करावयाच्या कामांची मोठी यादी असून ती कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगून पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, रस्ते, नाले, संरक्षण भिंती, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांची कामे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित आहेत. त्यामुळे अशा कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

शिंदखेड्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या नाल्याचा प्रश्न तसेच नाल्याला संरक्षण भिंत बांधण्याचे काम महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे ८५ गावांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित विषयही नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पिण्याचे पाणी, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर त्याचा लाभ केवळ आजच्या नागरिकांनाच नव्हे, तर भावी पिढ्यांनाही होतो. त्यामुळे दीर्घकालीन विकासाचा विचार करून ही कामे पुढे नेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक वाचनालय ज्ञानवृद्धीचे केंद्र ठरेल

गावाच्या भौतिक विकासाबरोबरच शैक्षणिक आणि वैचारिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. सार्वजनिक वाचनालयामुळे गावातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना ज्ञानाची नवी दारे खुली होतील. वाचन संस्कृती वृद्धिंगत होऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांनाही त्याचा उपयोग होईल. त्यामुळे सार्वजनिक वाचनालय ही केवळ एक इमारत न राहता गावाच्या ज्ञानवृद्धीचे आणि भावी पिढीच्या जडणघडणीचे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केली.

गावाचा विकास हा लोकसहभागातूनच अधिक वेगाने आणि परिणामकारकपणे साध्य होतो. निरगुडीने अनेक वर्षांपासून आपली एकजूट कायम ठेवली आहे. गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन, नागरिकांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य या बळावर निरगुडीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली कामे यापुढेही सातत्याने पुढे नेण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. रावल यांनी दिली. यावेळी सार्वजनिक वाचनालयाच्या भूमिपूजनाबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन करून गावाने सामाजिक एकोपा आणि विकासाची भूमिका यापुढेही कायम ठेवावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री. रावल यांनी केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed