• Tue. Aug 25th, 2026

राजू शेट्टी यांनी साखरेच्या भाववाढीवरुन संताप व्यक्त केला आहे. त्यांनी साखरेच्या साठ्याबाबतची थेट आकडेवारी सांगत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : राज्यात आणि देशात साखरेचे भाव कडाडले आहेत. साखरेच्या या भाववाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. “आज बाजारात जे साखरेचे दर कडाडले आहेत. ही अनैसर्गिक भाववाढ आहे. त्याला काहीही कारण नाही. कारण साधारणपणे मागणी आणि पुरवठ्याचे गुणोत्तर बिघडल्यावर भाव वाढतात किंवा कमी होतात”, असं राजू शेट्टी म्हणाले.

“आपली वर्षाची 270 ते 275 लाख टन इतकी साखरेची गरज आहे. प्रत्यक्षात गेल्यावर्षी साखर कारखान्यांचा सीजन सुरु झाला तेव्हा मागील वर्षाची 47 लाख टन साखर घेऊन सीजन सुरु झाला. वर्षभरात इथेनॉलचे उत्पादन घेऊन सुद्धा 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. 291 अधिक 47 म्हणजे 338 लाख टन साखर या सीजनमध्ये आपल्याला उपलब्ध होती. त्या तुलनेने आपल्याला केवळ 270 लाख टनची आवश्यकता होती. 8 लाख टन साखर निर्यात झाली. 330 लाख टन साखर शिल्लक राहिली”, असं राजू शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी काय म्हणाले?

“आज अखेर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने साखरेचा कोटा रिलीज केला आहे, महिन्याला 22 लाख टन ते रिलीज करतात, त्यांनी 247 लाख टन रिलीज केला आहे. याचा अर्थ अजून 80 लाख टन साखर शिल्लक राहायला पाहिजे. पण आता सरकार म्हणत आहे की देशात केवळ 35 लाख टन साखर शिल्लक आहे. हे सर्व आकडे सरकारचेच आहे. सरकार आता म्हणतंय की 35 लाख टन साखर शिल्लक आहे.”

48 लाख टन साखर गेली कुठे? राजू शेट्टींचा सवाल

“एकूण साखरेपैकी केवळ 247 लाख टन साखर रिलीज केलेली आहे. निर्यात वजा जाता 83 लाख टन साखरपैकी 48 लाख टन साखर कुठे गेली? गायब झाली का? त्याच्या दोन शक्यता निर्माण होतात. एकतर जो कोठा होता त्यापेक्षा जास्त साखर काही कारखान्यांनी कमी दरामध्ये विकली आहे. काही व्यापाऱ्यांनी खरेदी करुन आपल्याकडे ठेवली आहे. कारण अनेक साखर कारखानदार हेच व्यापारी आहेत हे लक्षात घ्या.”

“शेतकऱ्यांना चुना लावण्याचा उद्योग केलेला आहे. जी साखर 3600 आणि 3700 रुपये क्विंटलने खरेदी केली, ती आज ते 6500 रुपये क्विंटलने विकायला लागले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याचं काम केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचं असताना, त्यांनी यामध्ये काहीच केलं नाही.”

इतर राज्यांची साखर गेली कुठे? राजू शेट्टी यांचा सवाल

“देशामध्ये 35 लाख टन साखर शिल्लक आहे, असं केंद्र सरकार म्हणत आहे. त्यातील 25 लाख टन साखर ही केवळ महाराष्ट्रातच आहे. मग उत्तर प्रदेशची साखर कुठे गेली? पंजाब-हरियाणाची साखर कुठे गेली? पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूची साखर कुठे गेली? आंध्र प्रदेशची साखर कुठे गेली? याचा अर्थ महाराष्ट्र वगळता इतर राज्याच्या कारखान्यांनी नियम पाळला नाही. त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला नाही.”

बाहेरच्या देशात साखर विकली गेल्याचा आरोप

“48 लाख टन पैकी काही काही साखर व्यापाऱ्यांनी खरेदी करुन दाबून ठेवली आहे. ती साखर आता चढ्या दराने विकून पैसा कमवत आहेत. काही साखर तीन महिन्यापूर्वी सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली ती बंदी तोडून शेजारी राष्ट्रांबरोबर आपले खुल्या व्यापाराचे करार आहेत, त्याचा गैरफायदा घेऊन बाहेरच्या देशात साखर विक्री केली आहे.”

राजू शेट्टी यांचे गृहमंत्र्यांना सवाल

“अशावेळी बाहेरच्या देशात साखर जात असताना आमच्या देशाचे गृहमंत्री काय करत होते? त्यांची गृह खात्याची काही जबाबदारी होती की नाही? 48 लाख टन म्हणजे जवळपास 3 लाख ट्रक विदेशात गेल्या. अशावेळी गृहखातं काय करत होतं? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.”

Maharashtra TimesMahalaxmi Papamani : साडीत 30 ते 40 लाख खोचून फिरायची, 90 च्या काळातील मुंबईतील मादक पदार्थ तस्करांची महाराणी कोण होती?

‘केंद्र सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही’

“केंद्र सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. इथेनॉलमुळे साखर कमी पडलेली नाही, कारण असं झालं असतं तर साखर जास्त उत्पादन झाली असती, आणि साखरेचे भाव पडले असते. साखर वाढली की गुळाचे भाव आपोआप वाढतात. त्यामुळे गुळाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे, गुळ दरावर देखील या सगळ्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आयात केलेली साखर 15 ऑक्टोबरच्या आत येणार नाही. 15 सप्टेंबरपासून देशातील काही कारखाने सुरू होणार असल्यामुळे, साखर आयात करण्याचा सरकारचा निर्णय मूर्खपणाचा आहे, याचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसणार आहे.”