• Sun. Aug 23rd, 2026

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर आई-वडिलांसह मुलाने दरीत कोसळून केलेल्या आत्महत्येच्या भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर केवळ आयफोन आणि मोबाईलच्या हप्त्यांवरून वाद झाल्याने कुणालने हे टोकाचे पाऊल उचलले अशा चर्चांना प्रचंड उधाण आले होते. मात्र, या सर्व अफवांचे खंडन करत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. शुक्रवारी घटना घडताच स्थानिकांनी आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधला होता. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने खवड्या डोंगरावर पोहोचले. पोलिसांच्या अंमलदारांनी सलग पाच तास कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

​अडचणीत असशील तर सोडवू, पण आईच्या संवादातून वेगळाच सुगावा

डीसीपी रत्नाकर नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलीस अंमलदार आणि आई यांच्यात जो संवाद झाला, त्यावरून हा प्रकार केवळ मोबाईलच्या वादातून घडलेला वाटत नाही. आई कुणालला वारंवार तू काही अडचणीत असशील तर आपण ती अडचण सोडवू असे सांगत होती. तिथे जमलेल्या प्रत्यक्षदर्शींपैकी कोणीतरी त्याला शांत करण्यासाठी ‘मोबाईल घेऊन देतो’ असे विधान केले होते. परंतु, त्या एका वाक्यावरून ‘आयफोनसाठीच आत्महत्या केली’ या निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही.

​घरात साक्षीदारच उरला नाही; तपासाचे मोठे आव्हान

या दुर्दैवी घटनेत आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचाही मृत्यू झाल्यामुळे घरातील खरी वस्तुस्थिती सांगण्यासाठी आता कोणताही साक्षीदार शिल्लक राहिलेला नाही. कुणाल काही कारणास्तव प्रचंड तणावात होता, हे स्पष्ट आहे; मात्र त्याचा वाद नक्की कोणाशी आणि काय कारणावरून झाला होता, हे तपासातच समोर येईल.

​”सोशल मीडियावरील ‘आयफोन’च्या अफवांवर विश्वास ठेवू नका”

“आयफोन किंवा मोबाईलच्या हप्त्यांवरून कुणालने आत्महत्या केली, असे आपण सध्या अजिबात म्हणू शकत नाही. आत्महत्येमागे एकच कारण होते की अनेक कौटुंबिक वा आर्थिक कारणे होती, हे पोलीस तपासातूनच उघडकीस येईल. नागरिक आणि सोशल मीडियाने अशा कोणत्याही बिनबुडाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,” असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी केलं आहे.