• Thu. Sep 17th, 2026

Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं, म्हणाले, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने नाव जोडण्याचा प्रयत्न

दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. आपलं चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने या प्रकरणाशी आपलं नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच दिशा सालियन प्रकरणावर मौन सोडलं आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सर्वात आधी या प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांचं थेट नाव घेत आरोप केले होते. त्यानंतर वारंवार विविध नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पुन्हा सीबीआयकडे देण्यात आला आहे आणि या प्रकरणी FIR दाखल झाला आहे. या प्रकरणावरुन होत असलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो! मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या 6 वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कँपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या”, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.

“परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील”, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी आरोप करणाऱ्यांना दिलं आहे.

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी एफआयआर दाखल झाला आहे. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांचंदेखील नाव असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिलं आहे. यासोबतच अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अभिनेता डिनो मोरिया, सूरज पांचोली, रोहन रॉय, आदित्य ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, डीसीपी विशाल ठाकूर यांच नावे आहेत. तसेच अनेक मोठ्या नावांचा उल्लेख या एफआयआरमध्ये आहे. एफआयआरमध्ये नाव असलेल्यांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.