एल निनोच्या घोषणेनंतर १५ जूनपासून पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. काही दिवसांपूर्वी धरणात पुरेसा साठा असल्याचं सांगत पाणीकपात मागे घेतली. मग सोमवारी पुन्हा पाणीकपात करण्याची घोषणा केली आणि आता २४ तासांच्या आत निर्णय बदलला आहे.
खडकवासला धरणसाखळीत एकूण पाणीसाठा चार अब्ज घनफुटांपेक्षाही (टीएमसी) कमी झाला होता. त्यामुळे तातडीने पाणीकपात लागू करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने १५ जूनपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली.
Pune Water Cut: पुणेकरांचे हाल होणार! शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा; पाणीकपात कधीपासून लागू करणार?
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सात ते १२ जुलैदरम्यान पाणीकपात रद्द करण्यात आली होती. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्याने धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा होईपर्यंत दिवसाआड पाणीकपात लागू करण्याचा निर्णय आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी घेतला. मात्र, मंगळवारी सायंकाळी महापौर नागपुरे यांनी तूर्त पाणीकपात रद्द करीत असल्याची घोषणा केली.
समन्वयाचा अभाव की राजकारण?
पालख्यांनी पुण्यातून प्रस्थान केल्यानंतर पुन्हा पाणीकपात लागू होणार होती. मात्र, याबाबतचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत होईल, असे महापौरांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात पक्षनेत्यांची बैठक होण्याआधीच महापालिका आयुक्तांनी पाणीकपातीचा निर्णय जाहीर केल्याने लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यातूनच आयुक्त नाही, तर पाणीकपातीचा निर्णय लोकप्रतिनिधी घेतात, हे दाखविण्यासाठी पाणीकपात रद्द केल्याची चर्च पालिका वर्तुळात आहे.
“२२ जुलैनंतर हवामान विभागाचा पावसाचा अंदाज, धरणांतील उपलब्ध पाणीसाठा, धरणातील पाण्याची आवक; तसेच एकूण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल. पुणेकरांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने करावा,” मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका
Pune News: पुण्यात ३६ किमी लांब ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग’, उन्नत मार्गावरून टोल-मुक्त प्रवास; कसा असेल प्रकल्प?
‘पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता अपुरी’
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्यामुळे जुन्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची शुद्धीकरण क्षमता अपुरी पडत असल्याची कबुली पुणे महापालिकेने दिली आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळूनच वापरावे, असे तातडीचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मंगळवारच्या अंकात धायरी, खडकवासला आणि सिंहगड रस्ता परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या वृत्ताची दखल घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी सायंकाळी अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून पाण्याचा गढूळपणा वाढल्याची कबुली दिली; तसेच नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
