• Mon. Jul 6th, 2026

    संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 6, 2026
    संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती – महासंवाद

    कोल्हापूर, दि. ६: संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण असून सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.

    मुंबईतून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरप्रवण व पूरबाधित जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पंचगंगा नदीची वाढती पाणीपातळी, बचाव व मदतकार्याची तयारी, स्थलांतराचे नियोजन तसेच विविध विभागांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती सादर केली.

    त्यानंतर झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले की, जिल्ह्यात 3 जुलैपासून सरासरी 50 मिमी पावसाची नोंद होत असून पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दर 24 तासांत सुमारे 6 ते 7 फुटांनी वाढ होत आहे. डोंगरमाथा परिसरातील पावसाचे पाणी अद्याप नदीपात्रात येत असून घाटमाथ्यावर सुरू असलेली अतिवृष्टी लक्षात घेता पुढील 24 ते 48 तासांत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी आपत्कालीन प्रतिसादासाठी पूर्ण सज्ज राहावे.

    जीवितहानी टाळणे हे सर्वोच्च प्राधान्य असून कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या सखल भागातील वस्त्यांचे आवश्यकतेनुसार वेळेत स्थलांतर करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. दरवर्षी पूरग्रस्त होणारी गावे तसेच पाण्यामुळे संपर्क तुटणाऱ्या रस्त्यांजवळ आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री, बोटी आणि अन्य साधनसामग्री पूर्वतयारी म्हणून उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

    बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे, संबंधित विभागांचे कार्यकारी अभियंते तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

    पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी ‘शून्य जीवितहानी’ हे उद्दिष्ट ठेवून जलद प्रतिसाद प्रणाली प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. तसेच पूर नियंत्रण, बचाव आणि मदतकार्याशी संबंधित सर्व पथकांनी सतर्क व तत्पर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed