• Mon. Jul 6th, 2026

    प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करावी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 6, 2026
    प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करावी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    बारामती, दि. ६: जिल्ह्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करावी अशा सुचना दिल्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनीही प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

    उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी आज विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीबाबत आढावा घेतला.

    जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित भागातील नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवा. गावातील संपर्क तुटल्यास युद्धपातळीवर उपाययोजना करुन पूर्वरत करावे.मानवी जीविताचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य मानून प्रत्येक निर्णय घ्यावा.नियंत्रण कक्ष 24×7 पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावा व प्रत्येक तासाला परिस्थितीचा आढावा घ्यावा. धोकादायक भागातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करून सुरक्षित निवारा, अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात. पूर, भूस्खलन आणि धरण विसर्गाबाबत वेळेवर इशारे एसएमएस, सोशल मीडिया, ग्रामपंचायत व स्थानिक यंत्रणेमार्फत द्यावेत.

    कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालय सोडणार नाही. सर्व यंत्रणा सतत सज्ज ठेवाव्यात.एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल यांच्यात समन्वय ठेवून तातडीने बचावकार्य करावे. बंद रस्ते, पूल आणि घाटांवर कडक बंदोबस्त ठेवून नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखावे.अफवांवर नियंत्रण ठेवून अधिकृत माहितीच प्रसारित करावी. मृत्यू, जखमी आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमांनुसार तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी.

    वीज, पाणी, आरोग्य आणि दळणवळण सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर काम करावे. प्रत्येक दोन तासांनी परिस्थितीचा अद्ययावत अहवाल शासनाला सादर करावा. जिल्हाधिकारी स्वतः संवेदनशील भागांवर सतत देखरेख ठेवून आवश्यक ते निर्णय तातडीने घ्यावेत; कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. वारकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी.वयोवृद्ध महिला लहान मुले ही सुद्धा वारीमध्ये येणार आहेत त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी, माहिती तंत्रज्ञान पार्क (आयटी), औद्योगिक परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत  पोलिसांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना श्रीमती पवार यांनी दिल्या.

    जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने पाण्याच्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे,  नदीवरील पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये किंवा पात्रात उतरू नये, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

    भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने समन्वय साधून काम करावे, नागरिकांनीही प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संकटाच्या काळात एकजूटीने काम करुया आणि नैसर्गिक संकटावर मात करु या, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी केले.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed