• Thu. Jun 25th, 2026

    ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, २२ वर्षीय मयांकसाठी प्रवास ठरला शेवटचा; रात्री ११ वाजता फास्ट लोकलमध्ये काय घडलं?

    ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, २२ वर्षीय मयांकसाठी प्रवास ठरला शेवटचा; रात्री ११ वाजता फास्ट लोकलमध्ये काय घडलं?

    Mayank Lohar: रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादादरम्यान २२ वर्षीय मयांक लोहारची हत्या करण्यात आली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    महेश चेमटे, मुंबई : मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गर्दीने लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या कारणामुळे झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलमध्ये मंगळवारी रात्री २२ वर्षीय प्रवाशावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात मयांक लोहार प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून रेल्वे पोलिसांनी त्याचा शोध सुरू आहे.

    नेमकं काय घडलं?

    मयांक हा चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करत होता. अंधेरी आणि बोरीवली स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून त्याचा एका सहप्रवाशाशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने मयांकच्या पोटात चाकू भोसकल्याचा आरोप आहे.

    रात्री ११.०४ वाजता लोकल बोरीवली स्थानकात दाखल होताच आरोपीने पळ काढला. दरम्यान, याची माहिती मिळताच रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. जखमी प्रवाशाला तत्काळ स्ट्रेचरच्या सहाय्याने डब्यातून बाहेर काढून बोरीवली स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेण्यात आले.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: पहिल्याच पावसात रस्ते-रुळांवर पाणी तुंबलं, महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपलं; मुंबईसह 7 जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

    डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मयांकला रात्री ११.४२ वाजता रुग्णवाहिकेतून कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले. जीआरपी आणि आरपीएफचे कर्मचारीही त्याच्यासोबत होते. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, “लोकल बोरीवलीत पोहोचताच रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशाला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी सर्व यंत्रणा तत्परतेने कार्यरत होती.”

    घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (एडीआरएम) आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी पहाटेच्या सुमारास बोरीवली स्थानकाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये आरोपीची ओळख पटली आहे. डब्यातील प्रवाशांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

    Maharashtra TimesPune Crime : तुमची सिया अगदीच विशीची आहे हो! अगरवाल कुटुंबाने सोयरीक नाकारलेली, गोयलांचा हट्ट, केतनचं लग्न कसं जुळलेलं?

    संपूर्ण घटनाक्रम काय होता?

    चर्चगेट स्थानकावरून १०.०५ च्या सुमारस लोकल ट्रेन रवाना झाली. त्यानंतर १०.४२ ला ही लोकल अंधेरी स्थानकावर दाखल झाली. तेव्हा २२ वर्षीय मयंक लोहार प्रथम श्रेणीमध्ये चढला. त्यानंतर ट्रेन जेव्हा अंधेरी ते बोरिवली स्थानकांदरम्यान होती तेव्हा दोघांमध्ये लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद सुरू झाला. याच वेळी आरोपीने त्याची हत्या केली. नंतर ११.०४ च्या सुमारास बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर ट्रेन थांबताच आरोपी फरार झाला. ११.०७ ला रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मयंकला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा