• Thu. Aug 6th, 2026
    Monsoon Update : पावसाने दडी मारली, देशभर हाहाकार; मान्सूनच्या विलंबामागे ‘सोमाली जेट’ हे कारण; आता फक्त ‘या’ तारखांवरच आशा

    What Is Somali Jet : केरळमध्ये मान्सून ४ तारखेला दाखल झाला. त्यानंतर तो महाराष्ट्रात आणि तेलंगणात दाखल होणं अपेक्षित होतं, पण त्यापूर्वी तो गायब झाला. सगळ्या उत्तर भारतात खरीप पिकांची पेरणी त्यामुळे लांबली आहे, त्याशिवाय उकाड्याने त्रस्त जनसामान्यानांही पावसाची प्रतिक्षा लागलेली होती, पण सर्वकाही विस्कटले, पावसाचे सगळे अंदाज कसेकाय खोटे ठरले असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: केरळमध्ये एरवी १ जून रोजी हजेरी लावणारा मान्सून यंदा ४ जूनला दाखल झाला होता. सुरुवातील त्याचा वेगही मध्य भारतापर्यंत चांगला होता. पण पुढे सरकत असताना त्याचा वेग अचानक मंदावला. एवढच नाही तर तो गायबच झाला की काय अशाही चर्चा रंगल्या. संपूर्ण भारताला मान्सूनची प्रचंड प्रतिक्षा लागलेली आहे. गेल्या १२ दिवसांत महाराष्ट्रात आणि तेलंगणात मान्सून सक्रीय होता, पण पावसाचा वेग मात्र काहीच दिसून आला नाही. त्यानंतर आता तो पुढे सरकेल की काय अशी वेळ आली आहे. पावसाच्या दडीमागे सोमाली जेट हे देखील एक कारण असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. सोमाली जेटची प्रगती पाहिजे तशी झाली नसल्याने मान्सूनचा वेग मंदावला आहे, असं म्हटलं जात आहे.

    काय आहे सोमाली जेट?

    सोमाली जेट ही एक विषुववृत्तीय वायु प्रणाली आहे जी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ हिंद महासागरात तयार होते. भारताच्या मान्सूनसाठी महत्त्वाची असलेली सोमाली जेट ‘फाईंडलेटर जेट’ या नावानेही ओळखली जाते. सोमाली जेटमुळे पूर्व आफ्रिकेत तुलनेने कमी पाऊस पडतो. सोमाली जेट हा एक निम्नस्तरीय वायुप्रवाह आहे जो भारतात नैऋत्य मान्सून आणण्यास मदत करतो. सोमाली जेट कमकुवत झाला तर भारतातील मान्सूनही कमकुवत होतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या प्रणालींचाही अभाव आहे, ज्या सहसा मान्सूनला अनेक भागात ढकलण्यास मदत करत असतात. तसेच यावेळी एल निनोमुळे मान्सून कमकुवत होण्याची भीती हवामानशास्त्रज्ञ वारंवार व्यक्त करत आहेत.

    १ ते १९ जून पर्यंत ४० टक्के कमी पाऊस

    हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीत १ जून ते १९ जून दरम्यान देशात सरासरीपेक्षा ४० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सहसा, १ जून ते १७ जून दरम्यान देशात सरासरी ८०.६ मिमी पाऊस पडतो, परंतु या वर्षी आतापर्यंत केवळ ४८.५ मिमी पाऊस पडला आहे. मध्य भारतात ०१ जून ते १८ जून दरम्यान सरासरीपेक्षा ६३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

    २३ जूनपर्यंत छत्तीसगडला पोहोचेल

    भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आता २३ जूनपर्यंत छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सूनने वेग धारण केला आहे.

    पाणी पुरवठ्यावर परिणाम

    मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्रात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुण्यात सम-विषम पाणीपुरवठा प्रणाली लागू करण्यात आली आहे. मुंबईत उकाड्यामुळे हैराण नागरिक रात्रीच्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर जात आहेत. मुंबईत ११ जून रोजी पावसाचे आगमन अपेक्षित होते, परंतु तसे अद्याप झालेले नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ते २३ जून दरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील विदर्भात १९ ते २३ जून दरम्यान असेच हवामान अपेक्षित आहे.

    खरीप हंगामाला उशीर

    महाराष्ट्रात मान्सूनने उशिर केल्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच त्याचा परिणाम दिसू लागला आहे. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जून महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यात केवळ १ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. साधारणपणे या वेळेपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीचे काम वेगाने सुरू असते, परंतु पाऊस गायब असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत आणि पावसाकडे लक्ष ठेऊन आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा