• Tue. Jun 9th, 2026
    Ratnagiri News: आई-मुलीनंतर वडिलांचाही मृत्यू! पोलादपूर अपघाताने मरकड कुटुंब उद्ध्वस्त; 8 वर्षांचा चिन्मय झाला पोरका

    Mumbai Goa Highway Accident: मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलादपूर अपघातात पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आता अनिल मरकड यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या भीषण दुर्घटनेत मात्र 8 वर्षांचा चिन्मय आई-वडिला-बहिणीविना पोरका झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथील भीषण अपघाताने मरकड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाल्यानंतर मृत्यूशी झुंज देणारे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचेही मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या दुर्घटनेमुळे आठ वर्षांच्या चिन्मयच्या डोक्यावरून आई-वडील दोघांचेही छत्र हरपले आहे.

    पत्नीच्या बाराव्याच्या आदल्या दिवशी पतीचाही मृत्यू

    मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर येथील भीषण अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सहाय्यक नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले अनिल मरकड यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचे निधन झाले.

    या अपघातात अनिल मरकड यांची पत्नी सुवर्णा मरकड आणि मुलगी अनुश्री यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर अनिल मरकड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर गेल्या दहा-बारा दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.

    Maharashtra TimesNarhari Zirwal: मुंढेंच्या पाठीशी शासन ठामपणे उभं! FDA महिला अधिकाऱ्याला चिरडण्याच्या प्रयत्नानंतर मंत्री नरहरी झिरवाळ संतप्त, गुटखामाफियांना कडक इशारा

    8 वर्षांचा चिन्मय झाला पोरका

    या भीषण दुर्घटनेत मरकड दाम्पत्याचा आठ वर्षांचा मुलगा चिन्मय सुदैवाने बचावला. मात्र एका अपघातात आई, बहीण आणि आता वडिलांनाही गमावल्याने त्याच्या डोक्यावरून मातृ-पितृछत्र हरपले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    सुट्टीहून परतताना झाला अपघात

    मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त मरकड कुटुंब मूळ गावी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गेले होते. सुट्टी संपल्यानंतर दापोलीकडे परतत असताना 30 मे रोजी दुपारच्या सुमारास पोलादपूर येथे त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

    या अपघातात सुवर्णा मरकड आणि मुलगी अनुश्री यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल मरकड गंभीर जखमी झाले होते. विशेष म्हणजे पत्नीच्या बाराव्या विधीच्या आदल्या दिवशीच अनिल यांचे निधन झाल्याने कुटुंबीयांवर आणखी मोठा आघात झाला आहे.

    कृषी विद्यापीठातील लोकप्रिय अधिकारी

    अनिल मरकड हे 2007 मध्ये कृषी विद्यापीठात सहाय्यक अधीक्षक म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना पुढे सहाय्यक नियंत्रक पदावर बढती मिळाली होती. उच्च पदावर कार्यरत असूनही त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि हसतमुख होता. त्यामुळे विद्यापीठातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय होते.

    कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    अनिल मरकड यांचे वडील रावसाहेब मरकड हे पाथर्डी तालुक्यातील रुघ्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. आधी सून, नात आणि आता मुलाच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    बुधवारी तिसगाव येथे अनिल मरकड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे कृषी विद्यापीठ परिवारासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा