Koyna River Accident: साताऱ्यातील पाटण तालुक्यात कोयना नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू झाला. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांवर काळाचा घाला. कोयना धरणातून पाणी सोडल्याने नदीची पातळी वाढली होती.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मित्रांचा कोयना नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन अनिल कदम (वय 16) आणि करण दाजी कदम (वय 14, दोघेही रा. गाढखोप, ता. पाटण), अशी मृतांची नावे आहेत. दोनच दिवसांपूर्वी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आले असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसावा. त्यामुळे दोघेही खोल डोहात जाऊन बुडाले.
स्थानिकांनी काय सांगितलं?
कोयना धरणाच्या भिंतीपासून हाकेच्या अंतरावर असणार्या गाडखोप गावातील आर्यन आणि करण हे शाळकरी मित्र पोहोण्यासाठी कोयना नदीपात्रात गेले होते. दोनच दिवसांपूर्वी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत किंचित वाढ झाली आहे. दोघे मित्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन खोल डोहात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे.
पोलिसांनी शोधमोहिम राबवली
घटनेची माहिती मिळताच कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कोयना नदीच्या पात्रात शोधमोहीम राबवली. तासाभरानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पाटण तालुक्यावर शोककळा
या घटनेची नोंद कोयनानगर पोलीस ठाण्यात झाली आहे. गाडखोप गावातील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने कोयनानगर तसेच पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सध्या कोयना धरणातून १०५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. कोयना नदीची पाणी पातळी वाढली असल्याने नदीकाठच्या नागरीकांनी खोल पाण्यात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
गाडखोप गावातील एकाच गल्लीतील पाच-सहा मुले नदीकडे गेली होती. त्यात करण आणि आर्यन या दोघांनाच पोहता येत होते. एकजण पहिल्यांदा पोहायला गेला. तो बुडू लागल्याने त्याला वाचवायला दुसरा गेला. परंतु, दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. – एस. के. ओलेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कोयनानगर
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा