Chhatrapati Sambhajinagar Fuel Crisis: शहर परिसरात शेतकऱ्यांच्या डिझेल व पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत. डिझेलसाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना ‘मेलडी’ चॉकलेट देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.
मावसाळा (ता. खुलताबाद) येथील तरुण शेतकरी आदित्य श्रीखंडे शेताची नांगरणी कशी करावी, या पेचात आहे. दोन दिवसांपासून त्याचे ट्रॅक्टर डिझेल संपल्यामुळे शेतात उभे आहे. साडेतीन एकर शेती असलेला आदित्य खरीप हंगामासाठी नांगरणी करीत आहे. निम्म्या शेताची नांगरणी झालेली असताना शुक्रवारी डिझेल संपले. तेव्हापासून तो डिझेल आणण्यासाठी वेगवेगळ्या पंपांवर हेलपाटे मारत आहे. खुलताबाद, सराई, वेरूळ या भागात कोणत्याही पंपावर डिझेल शिल्लक नाही. दोन दिवसांपूर्वी डिझेलसाठी आदित्य रात्रभर पेट्रोल पंपावर थांबलेला होता. डिझेलची गाडी येणार असल्याचे समजले; पण गाडी आली नसल्याने निराश होऊन घरी परतला. काही शेतकरी पंपावर थांबलेले आहेत.
Sambhaji Bhide यांची लायकी काढली, मराठा बांधव भिडेंवर तुटून पडले, फडणवीसांवरही आरोप
‘तीन वर्षांपूर्वीपर्यंत आमच्याकडे बैलजोडी होती; पण बैलांना सांभाळणे परवडत नाही. शिवाय, शेतीच्या कामांचे यांत्रिकीकरण झाल्यानंतर ट्रॅक्टर घेतला. आंतरमशागत करण्यासाठी बैलजोडी रोजंदारीने बोलावतो. पण, मूळ नांगरणीचे काम बंद पडल्यामुळे डिझेलसाठी पुन्हा-पुन्हा पेट्रोल पंपावर जावे लागत आहे,’ असे आदित्यने सांगितले. सध्या पंपावर प्लास्टिकच्या कॅन घेऊन शेतकरी रांगेत उभे आहेत. डिझेल भरलेले वाहन आले तरी तासाभरात पंप ‘ड्राय’ होतो. इंधन तुटवड्याने खरीप हंगामाची कामे ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. जास्तीचे डिझेल घेऊ नये म्हणून काही पंपचालक वाहनात डिझेल देत आहेत; पण ट्रॅक्टर किंवा इतर वाहन शेतात, रस्त्यात बंद पडलेले असेल तर इथपर्यंत कसे आणणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
पुरेसे डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जगदीश डवले, चिंचोलीचे माजी सरपंच प्रभू वाघ, कृष्णा वाघ, शिवाजी डवले, श्रीमंत पठाडे, विलास शेळके, विश्वंभर हाके, गणेश हाके, बद्रीनाथ ढाकणे यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी, Eknath Shinde अचानक दिल्ली दौऱ्यावर का गेले? संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्टीकरण
मशागतीचे गणित बिघडले
दरवर्षी खरीप हंगामात ट्रॅक्टर नसलेले शेतकरी उधारीवर शेताची नांगरणी करतात. फक्त डिझेलच्या खर्चाचे पैसे देऊन उरलेले पैसे पीक निघाल्यावर देतात. यंदा डिझेल टंचाईमुळे ‘डिझेल आणा आणि नांगरणी करुन घ्या’ अशी अट ट्रॅक्टरचालकांनी घातली आहे. शिवाय, नांगरणीचा दर प्रतितास सहाशे रुपयांवरुन सातशे ते आठशे रुपये केला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. डिझेलची दरवाढ आणि टंचाईमुळे शेतकऱ्यांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
