El Nino Effects On Kharif: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना, खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या तयारीची माहिती त्यांनी दिली.
यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस आणि खत व्यवस्थापन ही दोन मोठी आव्हाने असतील. मात्र प्रशासन, कृषी विद्यापीठे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने या संकटांना सामोरे जाण्यासाठी सरकार सज्ज असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.
Bike Taxi : एकावेळी एका चालकाला एकच कंपनी, बाईक टॅक्सीचे नियम होणार कडक, प्रताप सरनाईक बैठकीत मोठा निर्णय घेणार
‘यंदाच्या खरीप हंगामात १५२ लाख हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ८८ टक्के राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जूननंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण क्रमाक्रमाने कमी होत जाण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, दोन पावसाच्या दरम्यान मोठे अंतर राहू शकते. त्यामुळे पिकांवर ताण येऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन जलयुक्त शिवारची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत’, असे फडणवीस म्हणाले.
‘महाविस्तार २.०’ ॲपचे अनावरण
या बैठकीत कृषी विभागाच्या ‘महाविस्तार २.०’ या ॲपचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत हवामान, पीक व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि बाजारभाव याविषयी माहिती मिळणार आहे. एआय आधारित कॉलिंग सुविधेद्वारे शेतकरी थेट संवाद साधू शकणार आहेत.
Vidhan Parishad : 17 पैकी 7 जागा द्या, शिंदेंची ठाण्याचीही मागणी; सुनेत्रा पवारांना हव्या पुण्यासह तीन जागा, भाजप पेचात
खतांची साठेबाजी रोखणार
‘सध्या राज्यात खतांचा सुमारे २५ टक्के जुना साठा उपलब्ध असून, नवीन साठाही येणार आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खतांचा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खतांचा चुकीचा वापर, साठेबाजी आणि फेरफार रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. खतांचा वापर औद्योगिक कारणांसाठी होणार नाही, यासाठी आम्ही दक्षता घेऊ. प्रत्येक रेक पॉइंटवर जीआयएस मॅपिंग आणि व्हिडीओग्राफी केली जाणार आहे. खत उतरवताना कृषी विभागाचा कर्मचारी उपस्थित राहील आणि संपूर्ण साखळीवर देखरेख ठेवेल’, अशी माहिती फडणवीस यांनी दिली
