कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र झाला असून 9 जून रोजी भव्य मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. 78 गावांचा समावेश आणि जमिनीच्या भूसंपादनावरून आंदोलन अधिक आक्रमक होत असून सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
कोल्हापुरातील कसबा बावडा येथे गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अशा टॅगलाईन खाली भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस आमदार सतेज पाटील , शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिवसेना उबाठा गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राजू बाबा आवळे, राजीव आवळे, संपतबापू पाटील यांसह जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते आणि हजारो शेतकरी उपस्थित होते.
नव्या अधिसूचनेवर आक्षेप
मेळाव्यात बोलताना प्रमुख वक्त्यांनी सांगितले की, नव्या संरेखनेमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर पिकाऊ आणि बागायती जमीन भूसंपादनात जाण्याचा धोका आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 78 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. हा मार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला प्रकल्प असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांनी बोलताना आता रस्त्यावरची लढाई आणि कायदेशीर तांत्रिक लढाई तीव्र करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, यासाठी आता शड्डू ठोकून रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलो आहे. प्रसंगी अंगावर लाठी खाऊ, जेलमध्ये जाऊ पण मागे हटणार नाही. आता आरे ला का रे उत्तर असेल. पोलिसी बळाचा वापरानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असणार आहे.” तसेच जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि विविध संघटनांकडून 25 मेपूर्वी शक्य तितक्या जास्त हरकती नोंदवण्याचे आवाहनही सतेज पाटील यांनी केले आहे.
Tukaram Mundhe: CM फडणवीसांचा कडक निर्णय, तुकाराम मुंढेंकडे आता FDAची धुरा; प्रशासनात आणखी कोणते बदल?
महापुराचा धोका आणि शेतीचा प्रश्न
माझी खासदार राजू शेट्टी आणि इतर नेत्यांनी महामार्गासाठी टाकल्या जाणाऱ्या भरावांचा वारणा, कासारी, पंचगंगा, भोगावती, तुळशी आणि कुंभी नद्यांच्या प्रवाहावर परिणाम होऊन पूरस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशारा दिला. विशेषतः ऐतवडे ते बहिरेवाडी आणि केर्ली ते शिरोली दुमाला या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भराव होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. या भरावांमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा थांबून बागायती शेतीचे नुकसान होऊ शकते, तसेच ऊस उत्पादनात घट आणि साखर उद्योगावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही मत मांडण्यात आले.
“हा प्रकल्प खासगीकरण…”
या महामार्गाचा खर्च वाढत जाऊन सुमारे 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा आरोप मेळाव्यात करण्यात आला. राजू शेट्टी यांनी संयुक्त मोजणी, ड्रोन सर्व्हे आणि जमिनीचे नमुने घेण्यास विरोध करण्याची भूमिका मांडली आहे. शेट्टी यांनी बोलताना, “हा प्रकल्प खासगीकरण आणि टोल वसुलीवर आधारित असल्याचे सांगत सरकारने जनतेच्या हिताऐवजी निवडणुकीच्या राजकारणासाठी हा मार्ग पुढे रेटला जात आहे,” असा दावा केला. तर “कोल्हापूरचा विकास हवा असल्यास पर्यायी रेल्वेमार्ग, वाहतूक दुवे आणि शेतीला बाधा न आणणारी पायाभूत कामे केली पाहिजेत,” अशी मागणीही शेट्टींकडून करण्यात आली.
दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात 9 जूनचे आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता राज्यभर नेण्याचा निर्धार करण्यात आला. तर मोर्चा बघून मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग थेट रद्दच करावा लागेल, असा विश्वासही मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 9 जूनचा मोर्चा शक्तीपीठ महामार्गविरोधातील पुढील निर्णायक टप्पा ठरण्याची शक्यता आहे.
