• Sat. Jun 6th, 2026
    Murud-Janjira Fort : तब्बल 350 वर्षे ‘अजिंक्य’ राहिलेला जंजिरा किल्ला पुढचे तीन महिने बंद राहणार

    तब्बल 350 वर्ष अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला हा पुढचे तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटक शेवटच्या काही दिवसांमध्ये अजिंक्य किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. शिवरायांनी अथक परिश्रम करुन स्वराज्य स्थापन केलं. शिवरायांच्या जीवनात अनेत उतारचढाव आले. पण शिवरायांनी लढायचं कसं ते दाखवून दिलं. शिवरायांचा इतिहास आपल्याला खूप प्रेरणा देतो. शिवाजी महाराजांचे नाव घेतले की, प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरुन निघतो. शिवचरित्राचा जितका अभ्यास केला तितका कमी आहे. शिवचरित्रातून खूप गोष्टी शिकता येतात. राजा कसा असावा? याचं खूप चांगलं उदाहरण शिवाजी महाराज आहेत. शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा अत्यंत संवेदनशीलपणे विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. रयतेचं संरक्षण ही प्रथम जबाबदारी मानणारे राजा होते.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा खूप मोठा विस्तार केला. मुघलांच्या सरदार आणि लाखोंच्या सैनिकांना सळो की पळो करुन सोडलं. असं असलं तरी महाराजांना एक किल्ला जिंकता आला नाही. तो किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील मुरुड जंजिरा किल्ला. हा किल्ला तब्बल 350 वर्ष अजिंक्य राहिला. छत्रपती शिवाजी महाराजच नाहीत तर ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच अशा कुणालाही हा किल्ला जिंकता आला नव्हता. या किल्ल्यात असं काय आहे याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्यामुळे नेहमी या किल्ल्याला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पण हा किल्ला आता पुढचे तीन महिने बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. असं असलं तरी शेवटच्या तीन दिवसांतही जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी बघायला मिळते.

    जंजिरा किल्ला तीन महिने का बंद राहणार?

    मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील ऐतिहासिक आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला जंजिरा किल्ला हा मंगळवार २६ मेपासून पुढील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार असल्याने पर्यटकांनी जंजिराकडे अक्षरशः धाव घेतली आहे. पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात वाढणाऱ्या वादळी वाऱ्यांचा वेग, उंच लाटा आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून मेरीटाईम बोर्डाने किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या शनिवार-रविवारी जंजिरा किल्ल्यावर विक्रमी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक दरवर्षी जंजिरा किल्ल्याला भेट देत असतात. विशेषतः सुट्टीच्या दिवशी राजपुरी येथील धक्क्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तिकीट खरेदीसाठीही पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. बंदीपूर्वी अखेरची सफर करण्यासाठी अनेक पर्यटकांनी मुरुडकडे मोर्चा वळविल्याने स्थानिक पर्यटन व्यवसायालाही मोठी चालना मिळत आहे.

    सध्या समुद्रातील लाटांचा जोर वाढू लागल्याने किल्ल्याकडे जाणाऱ्या शिडाच्या बोटी मोठ्या प्रमाणात हेलकावे घेत आहेत. त्यामुळे पर्यटकांना बोटीत चढताना आणि किल्ल्यावर उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा समुद्रातील बदलत्या हवामानामुळे बोटींच्या फेऱ्यांवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील जंजिरा पाहण्याची उत्सुकता पर्यटकांमध्ये कायम असल्याचे चित्र सध्या राजपुरी परिसरात पाहायला मिळत आहे.

    दरम्यान, किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करणाऱ्या शिडाच्या बोटीधारकांसाठी हा हंगामाचा अखेरचा टप्पा ठरत आहे. किल्ला बंद झाल्यानंतर पुढील तीन महिने रोजगार पूर्णपणे ठप्प होणार असल्याने बोटीधारकांकडून अधिकाधिक पर्यटकांना किल्ल्यावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे धक्क्यावर दिवसभर पर्यटकांची वर्दळ आणि बोटीधारकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
    सप्टेंबर महिन्यात पावसाळा ओसरल्यानंतर हवामान अनुकूल झाल्यावर पुन्हा जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा