• Sun. Jun 7th, 2026
    दुर्दैवी! बंधाऱ्यात बुडून महिलेसह तीन चिमुकल्यांचा मृत्यू; नांदूरशिंगोटेत मजूर कुटुंबावर शोककळा

    Nashik Drown Death: नांदूरशिंगोटे येथील नागरे वस्ती परिसरातील बंधाऱ्यात बुडून 28 वर्षीय महिला व तीन चिमुकल्यांचा करुण मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    बंधाऱ्यात बुडून महिलेसह तीन चिमुकल्यांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.वृत्तसेवा, सिन्नर: सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील नागरे वस्ती परिसरातील बंधाऱ्यात बुडून महिला आणि तीन चिमुकल्यांचा करुण मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. यवतमाळ जिल्ह्यातून पुण्याकडे कामासाठी निघालेल्या मजूर कुटुंबावर या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

    मृतांमध्ये मनीषा विजय रामजोशी (वय २८), तिचा मुलगा कार्तिक विजय राम जोशी (११), तसेच भाचे आदित्य राहुल शिंदे (७) आणि अविनाश राहुल शिंदे (८, सर्व रा. वडारपुरा, डिग्रस, जि. यवतमाळ) यांचा समावेश आहे.
    Maharashtra TimesNashik News : पुण्याहून नाशिकला लग्नाला, आईचं दूध प्यायल्यानंतर चिमुकलीची हालचाल थांबली; चार महिन्याच्या लेकीच्या मृत्यूचं खरं कारण समोर
    डिग्रस येथील हे कुटुंब पुणे येथे नाली खोदकामाच्या कामासाठी निघाले होते. इतर नातेवाइकांची वाट पाहण्यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी नांदूरशिंगोटे परिसरात तात्पुरता मुक्काम केला होता. मुक्कामाच्या ठिकाणाजवळील नागरे बंधाऱ्यावर शनिवारी मनीषा रामजोशी कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या. सोबत कार्तिक, आदित्य आणि अविनाश हेही गेले होते.

    बराच वेळ उलटूनही चौघे परत न आल्याने विजय रामजोशी आणि राहुल शिंदे यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. तेथे कपडे आणि चपला आढळल्याने संशय बळावला. यानंतर दोघांनीही बंधाऱ्यात उतरून शोध सुरू केला. काही वेळातच चारही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

    Maharashtra TimesNashik Crime: नाशिकमध्ये माणुसकी ओशाळली! 70 वर्षीय नराधमाचा 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, घटनेनं संताप
    तर दुसऱ्या एका घटनेत, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती तलावात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली. हिंगणी (ता. धारूर) येथील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील एका महिलेसह सहा मुली शनिवारी १२ वाजण्याच्या दरम्यान हिंगणी येथील सरस्वती तलावावर गेल्या होत्या. यातील तीन मुली थर्माकॉलच्या तराफ्यावरून तलावात उतरल्या. अचानक तराफा पलटी होऊन पलक पारवे, दिव्या कांबळे आणि मोहिनी पारवे पाण्यात पडल्या. यातील पलक श्याम पारवे आणि दिव्या विकास कांबळे व यांचा बुडून मृत्यू झाला .

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा