NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटी प्रकरणातील म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. पी. व्ही. कुलकर्णीला सीबीआयनं बेड्या ठोकल्या आहेत. तो केमिस्ट्रीचा प्रोफेसर आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लातूर/पुणे: NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं मोठी कारवाई केली आहे. या सगळ्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात सीबीआयला यश आलं आहे. पी. व्ही. कुलकर्णी असं आरोपीचं नाव आहे. तो केमिस्ट्रीचा प्राध्यापक असून एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता.
पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. कुलकर्णी मूळचा लातूरचा आहे. तो पुण्यात केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या परीक्षा प्रक्रियेत त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला प्रश्नपत्रिका सहज उपलब्ध व्हायच्या. कुलकर्णी लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. तो आता निवृत्त झालेला आहे. आरोपी मनीषा वाघमारेच्या चौकशीतून सीबीआय कुलकर्णीपर्यंत पोहोचली. त्याची बराच वेळ चौकशी करण्यात आली. यानंतर त्याला अटक केली गेली.
सीबीआयच्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ च्या अखेरच्या आठवड्यात कुलकर्णीनं एक अन्य आरोपी मनीषा वाघमारेच्या मदतीनं विद्यार्थी गोळा केले. त्यानंतर त्यानं पुण्यातील स्वत:च्या घरी स्पेशल कोचिंग क्लास घेतले. मनीषा वाघमारेला सीबीआयनं १४ मे २०२६ रोजी अटक केलेली आहे. पुण्यातील क्लासमध्येच विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारे प्रश्न, त्यांचे पर्याय आणि योग्य उत्तरं सांगण्यात आली. तेच प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG परिक्षेत आल्याचं पुढे उघडकीस आलं.
नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयनं गेल्या २४ तासांत देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मोबाईल जप्त करण्यात आली आहेत. या जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपास सुरु आहे.
१२ मे २०२६ रोजी शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागानं या प्रकरणात सीबीआयकडे लेखी तक्रार नोंदवली. NEET-UG २०२६ परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. तक्रार मिळताच सीबीआयनं विशेष तपास पथकं तयार केली आणि देशभरात छापे टाकले. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. जयपूर, गुरुग्राम, पुणे आणि अहिल्यानगरातून अटकेच्या कारवाया झाल्या आहेत. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना ट्रान्झिट रिमांडसाठी पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात येईल
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा