• Sun. Jun 14th, 2026

    पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 14, 2026
    पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – महासंवाद

    सोलापूर, दि. १४ (जिमाका) :  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर,  श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांसारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते जाळे  मजबूतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेले हे महामार्ग प्रकल्प जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोचण्यास भाविकांसाठी सुलभ झाले आहेत. श्री विठ्लाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वेगळा रस्ता केला आहे. यामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

    संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी  केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील,  माजी आमदार राम सातपुते,  जिल्हाधिकारी  कार्तिकेयन एस , पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी विजया पांगरकर, सचिन इथापे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी तसेच अधिकारी, मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

    यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री  गडकरी म्हणाले, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट हे रस्ते यापूर्वी मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्यामुळे वारकरी भाविकांना वाहतुकीच्या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या मार्गावरील रस्ते करण्याची संधी मिळाली तर ते रस्ते चांगले कर अशी इच्छा माझ्या आईनी व्यक्त केली होती. पांडुरंगाच्या व आईच्या आशीर्वादाने मला रस्ते करण्याची संधी मिळाली. सद्या पालखी महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील.  पालखी महामार्गावरील काही ठिकाणची रखडलेली कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येतील. तसेच वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून काही परवानगी आलेल्या नाहीत त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी  माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पुरातन विहिरीचे जतन व संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती या ठिकाणी पालखी महामार्गात विशेष रचना  करून पुरातन विहिरीचे जतन व संवर्धन करण्यात आले.  तसेच पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीचे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जतन व संवर्धन करण्यात आले आहे. या दोन्ही विहिरींची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण देखील  करण्यात आले.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसने प्रवास करत  पालखी महामार्गाची केली पाहणी

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, महानगरात मेट्रोने प्रवास करावा असे आवाहन केले. मोदींच्या आवाहनानुसार, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी बसने प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आपल्या  ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सुरक्षा कर्मचारी, अधिकारी यांच्यासह बसने प्रवास केला.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed