• Sat. Jun 13th, 2026

    सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला; ‘ती’ यादी समोर आल्यामुळे भेटीला महत्त्व, टायमिंगची चर्चा

    सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला; ‘ती’ यादी समोर आल्यामुळे भेटीला महत्त्व, टायमिंगची चर्चा

    Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीचं टायमिंग महत्त्वाचं असल्यानं त्याबद्दल विविध चर्चांना उधाण आलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. तटकरे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर शरद पवार यांची भेट घेतली. सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याची यादी समोर आल्यानंतर तटकरेंनी शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक बंगला गाठल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर तटकरे आणि शरद पवार यांच्या फारशा गाठीभेटी झालेल्या नाहीत. अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा होती. पण अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर हा विषय थंड बस्त्यात गेला. अजित पवारांच्या पक्षातून विलिनीकरणाला सर्वाधिक विरोध सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचाच होता, अशीही चर्चा होती. शरद पवारांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी तसे दावेही केले. त्यामुळेच तटकरे आणि शरद पवारांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीतून अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रफुल पटेल यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरुन आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदावरुन दूर करण्यात आल्याचं कार्यकारिणीच्या यादीतून स्पष्ट झालं. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तटकरे सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. त्यामुळेही या भेटीची अधिक चर्चा आहे.

    सुनील तटकरे काय म्हणाले?
    शरद पवारांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नाही. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली. ‘शरद पवार साहेबांची भेट बऱ्याच दिवसांपासून घ्यायची होती. आज आसामच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होता. त्यामुळे एनडीएचे सगळे नेते तिथे होते. मीदेखील तिथेच होतो. यानंतर उद्या माझा दौरा आहे. शरद पवारांना आजच वेळ होता. त्यामुळे त्यांच्या भेटीला गेलो,’ असं तटकरेंनी सांगितलं.

    राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याची घटना आणि त्यानंतर शरद पवारांची भेट यांचा काही संबंध आहे का, असं विचारताच तटकरेंनी नकारार्थी उत्तर दिलं. दोन्ही घटनांचा काहीही संबंध नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीबद्दल माननीय उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलेलं आहे. त्यांनी याबद्दलचा खुलासा केलेला आहे. शरद पवारांची भेट केवळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती, असं तटकरेंनी सांगितलं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा