• Sun. Jun 14th, 2026

    पुण्याचा प्रवास भुयारी मार्गांतून! शहरात पाच बोगद्यांना गती; कात्रज, येरवाडा, स्वारगेटला जोडणार

    पुण्याचा प्रवास भुयारी मार्गांतून! शहरात पाच बोगद्यांना गती; कात्रज, येरवाडा, स्वारगेटला जोडणार

    Pune Underground Tunnels: पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकार शहरात भुयारी मार्ग उभारणयाची योजना आखत आहे. सध्या पाच भुयारी बोगदे प्रस्तावित असून लवकरच त्यांचा विकास सुरू होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उत्तर-दक्षिण अशा स्वरूपात ५४ किलोमीटरचे पाच भुयारी मार्ग निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आराखडा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शहरातून सध्या शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गातून धावणाऱ्या मेट्रोचा विस्तार कात्रजपर्यंत केला जाणार असताना, आता वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडत असल्याने भुयारी मार्गातून वाहने लवकरच धावणार आहेत. पुढील काही दिवसांत सल्लागार नियुक्त करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांनुसार स्वतंत्र कंपनीद्वारे बोगद्यांची निर्मिती केली जाणार आहे.

    प्रकल्प आराखडा तयार

    महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘पाताळलोक’ उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शहरातील वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते आणि उत्तर-दक्षिण दरम्यानची तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पाच मोठे भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३४ हजार कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून, प्रकल्पासाठी स्वतंत्र उद्देश वहन यंत्रणा (एसपीव्ही) स्थापन करण्यासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.या योजनेची प्राथमिक जबाबदारी पुणे महापालिकेवर सोपविण्यात आली असून, बोगदा बांधकामातील आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या सल्लागार कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. बोगद्यांचे तांत्रिक सर्वेक्षण, रचना, भूगर्भ तपासणी, वाहतूक नियोजन आणि आर्थिक व्यवहार्यता यासाठी स्वतंत्र सल्लागार नेमले जाणार असून, ही सर्व प्रक्रिया विशेष कंपनीच्या (एसपीव्ही) माध्यमातूनच पूर्ण केली जाणार आहे.

    पुणे भुयारी मार्ग (1)

    पुण्यातील बहुतांश प्रमुख रस्ते पूर्व-पश्चिम धर्तीवर विकसित झाले असले, तरी उत्तर-दक्षिण वाहतूक अजूनही अरुंद रस्ते, टेकड्या आणि मर्यादित जोडरस्त्यांमुळे कोंडीत अडकते. दक्षिण पुण्याकडे जाण्यासाठी उपलब्ध रस्त्यांची क्षमता अपुरी पडत असल्याने नव्या रस्त्यांसाठी जमिनीचा प्रश्न गंभीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जमिनीखालील भुयारी रस्त्यांचा पर्याय पुढे आला आहे. या आराखड्यात कात्रज, येरवडा, खडी मशिन, स्वारगेट, रेसकोर्स, जगताप डेअरी, सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड, औंध, संगमवाडी आणि खडकी हे प्रमुख भाग भुयारी मार्गांनी जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    नेमका कोठे होणार प्रकल्प ?

    येरवडा येथील शास्त्रीनगर ते कोंढवा येथील खडीमशीन चौक, सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ते औंध मार्गे जगताप डेअरीपर्यंत; तसेच खडकी येथून येरवडा येथील शास्त्रीनगर चौक आणि पु. ल. देशपांडे उद्यान येथून शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक; तसेच बाणेर-पाषाण या विकास आराखड्यातील भुयारी मार्गांचा यामध्ये समावेश आहे. ‘पीएमआरडी’ एने केलेल्या प्राथमिक विकास आराखड्यानुसार या प्रकल्पासाठी ३४ हजार कोटी रुपये खर्च आहे.

    पालिकेचे स्वतंत्र दोन बोगदे

    राज्य सरकारच्या पाच भुयारी मार्गांव्यतिरिक्त पुणे महापालिकेकडून स्वतंत्रपणे आणखी दोन बोगदा प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू आहे. पाषाण-कोथरूड आणि हिंगणे धनकवडी या दोन मार्गांवर स्वतंत्र बोगदे उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे, त्यासाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत.

    ‘एसपीव्ही’वरच प्रकल्पाचा भर

    पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ३४ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. मात्र, त्याचवेळी पालिकेच्या अर्थसंकल्पावर त्याचा बोजा पडू नये, या दृष्टीने स्वतंत्र कंपनीमार्फत त्याची अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात या सर्व बोगद्यांच्या अंमलबजावणीसाठी ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ प्रमाणे स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाण्याची चिन्हे आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा