MLC Election: विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना उबाठानं उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसनंदेखील या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत महाबिघाडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करताच काँग्रेस नं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही चर्चा न करता उमेदवारी जाहीर करणं चुकीचं असल्याचं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. माणिकराव ठाकरे यांनीदेखील याच शब्दांमध्ये नाराजीचा सूर लावला आहे. काँग्रेस पक्षानं विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे मविआत फूट पडल्याचं चित्र दिसू लागलं आहे.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेना उबाठानं अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे. दानवे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता त्यांच्या वाट्याला केवळ १ जागा येऊ शकते. मात्र काँग्रेस आणि शिवसेना उबाठात बिनसल्यानं मविआच्या हातून एकमेव जागा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधान परिषदेची निवडणूक शिवसेना उबाठा पक्ष लढवत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही होतो. त्यांच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा होता. पण त्यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर केला. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करताना आघाडीतील पक्षांशी किमान चर्चा करायला हवी होती, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी बोलून दाखवली. ठाकरेंच्या निर्णयाबद्दल उघड नाराजी व्यक्त करणारे वडेट्टीवार कधीकाळी ठाकरेंच्याच पक्षात होते. २००४ मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर चिमूर मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे त्यांनी काँग्रेसची वाट धरली.
‘शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा झाल्यावर मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोललो. शिवसेनेनं दानवेंच्या नावासंदर्भात तुमच्याशी चर्चा केली होती का, अशी विचारणा सपकाळ यांच्याकडे केली. त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. आम्ही आता चर्चा करु. त्यानंतर उमेदवारीबद्दल निर्णय घेऊ,’ असं म्हणत वडेट्टीवार यांनी काँग्रेस विधान परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
याचवेळी बोलताना वडेट्टीवार यांनी २ वर्षांनी होणाऱ्या राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकींचाही उल्लेख केला आहे. ‘नुकतीच राज्यसभेची निवडणूक झाली. त्यावेळी शरद पवारांच्या नावावर आमचं एकमत झालं. आता परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना आमचा पाठिंबा होताय पण आमच्याशी चर्चा न करता त्यांनी उमेदवार जाहीर केला. त्यामुळे २ वर्षांनी होणाऱ्या राज्यसभेची जागा आम्हालाच मिळायला हवी,’ अशी ठाम भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली.
२०२८ मध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसनं आताच दावा केला आहे. यामुळे शिवसेना उबाठाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांची गोची झाली आहे. संजय राऊत यांच्या राज्यसभेची टर्म २०२८ मध्ये संपेल. मविआतील अन्य पक्षांनी सहकार्य केल्याशिवाय ते पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकणार नाहीत. कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांना राज्यसभेवर पाठवण्याइतकं संख्याबळ नाही. अशा परिस्थितीत संजय राऊत माजी खासदार होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा