मराठी भाषेच्या मुद्द्यावरून अमित ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी परप्रांतीय रिक्षा चालकांना थेट इशारा दिला आहे. “मुंबई बंद करण्याची ताकद त्यांच्यात नाही, मराठी रिक्षा चालक मुंबई सुरळीत ठेवतील,” असं अमित ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे.
अमित ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ,पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी रिक्षा चालकांच्या मराठी भाषा मुद्द्यावरून परप्रांतीय रिक्षा चालकांवर जोरदार टीका केली. “ज्यांना मराठी बोलायची नाही, त्यांनी आपल्या गावी परत जावं,” असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. राज्य शासनाने मराठी भाषा जाणणाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करत, रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. मात्र, याच मुद्द्यावर सरकारमधील काही घटक विरोध करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
अमित ठाकरे यांनी पुढे सांगितलं की, परप्रांतीय संघटना संपावर ठाम असल्या तरी आम्ही मराठी भाषेच्या प्रश्नावर तितकेच ठाम आहोत. “मुंबई बंद करण्याची ताकद त्यांच्यात नाही. जर तसं झालं, तर आमचे मराठी रिक्षा चालक मुंबईची वाहतूक सुरळीत ठेवतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
४ तारखेला जाहीर करण्यात आलेल्या संपाबाबत त्यांनी सावध भूमिका घेत, “संपाच्या दिवशी परिस्थिती पाहून प्रतिक्रिया देऊ, मात्र कुणीही आमच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊ नये,” असा इशाराही त्यांनी दिला. राजकीय प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख करत, “मी त्यांच्याकडे पाहूनच राजकारणात आलो. ते नेहमी स्पष्ट आणि मनापासून बोलतात,” असं सांगितलं.
दरम्यान, राज्यातील इतर मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं. ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करत, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले आणि न्यायालयीन प्रक्रियेचाही उल्लेख केला. तसंच, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात वाढत्या ड्रग्स विक्रीबाबत गंभीर चिंता व्यक्त करत त्यांनी प्रशासनावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोरेगावमधील NESCO Centre येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख करत, त्या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची टीका त्यांनी केली. या घटनेत दोन तरुणींचा मृत्यू झाल्याने, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
एकीकडे मराठी भाषा आणि स्थानिकांच्या हक्कांचा मुद्दा, तर दुसरीकडे संप आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप—या सर्व पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा