आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेल्या कथित धमकीमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत, गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि आंबी यांना संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या प्रकरणात प्रकाशक प्रकाश आंबी यांना कथित जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे केवळ एका व्यक्तीची सुरक्षा नव्हे, तर राज्यातील वैचारिक वातावरण सुरक्षित आहे का, असा व्यापक प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने गुन्हा दाखल करण्याची आणि संबंधितांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशी धमकी दिली आहे. ही धमकी केवळ एका व्यक्तीला नसून महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला दिलेले आव्हान आहे. आमदार गायकवाड यांनी प्रकाशक आंबी यांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे गुंडगिरीची भाषा वापरणे हे लोकशाहीला घातक आहे. अशा आमदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
Sanjay Gaikwad Controversy : ‘तुझाही गोविंद पानसरे करतो!’, संजय गायकवाडांच्या कथित धमकीने खळबळ; वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना धाडलं पत्र
कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचे समर्थन करणारी भाषा आमदार वापरत असतील, तर राज्यात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक श्री. प्रकाश आंबी हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुरोगामी आणि प्रगत विचार समाजात पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, शासनाने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे. महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्यांचा इतिहास असताना, एका आमदाराने जाहीरपणे हत्येची धमकी देणे ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची ऑडियो क्लिप व्हायरल होऊनही शासन गप्प का? गृहखात्याने तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
मात्र, सत्ताधारी गटाकडून या आरोपांवर सावध भूमिका घेतली जात आहे. काही नेत्यांच्या मते, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून, केवळ राजकीय फायद्यासाठी मुद्दा वाढवला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी त्याची सत्यता तपासणे महत्त्वाचे असल्याचेही सांगितले जात आहे.
