UGC Pay Scale For Teachers : राज्यातील ७ आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने या शिक्षकांना UGC स्केलनुसार वेतन आणि भत्ते लागू करण्यास मंजुरी दिली असून, आगामी पदभरतीत १० अतिरिक्त गुणांचा लाभही मिळणार आहे.
अतिरिक्त १० गुण
दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सात महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि शिक्षकांना पदावर काम करताना आता यूजीसी स्केलने मूळ वेतन, महागाई भत्ता आणि अन्य भत्तेही मिळणार आहेत. याचा परिणाम म्हणजे आता शिक्षकांच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतील. फक्त एवढंच नाही तर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या भविष्यात होणाऱ्या पदभरतीमध्येही या सर्व शिक्षकांना अतिरिक्त १० गुण दिले जाणार आहेत.
न्यायालयाकडून मान्यता
राज्यात अनेक शिक्षक हे तासिका तत्वावर किंवा मर्यादित वेतन श्रेणीवर काम करतात. मात्र आता सहाय्यक प्राध्यापकांच्या यूजीसी स्केलने वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. डीएच्या वाढीमुळे प्रत्यक्ष हातात येणाऱ्या वेतनात आता मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे याविषयी अनेक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती, त्यांना आता न्याय मिळाला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं हा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याला न्यायालयाकडून मान्यता देण्यात आली आहे.
Raigad News : घाटात बेवारस बाईक दिसली अन् संशय बळावला, 700 फूट खाली उतरताच बचाव पथकाच्या पायाखालची जमीनच सरकली
शिक्षकांनी काय म्हटलं?
दरम्यान, या मोठ्या निर्णयामुळे आता समान काम, समान वेतन या तत्वाला बळ मिळणार आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढणार आहे, त्यांची शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी शिक्षकांनी दिल्या आहेत. एकूणच काय तर या निर्णयामुळे शिक्षकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. त्यांना करिअरमध्ये अतिरिक्त संधीसाठी वाव मिळाला आहे आणि शिक्षण व्यवस्थेला बूस्ट मिळाला आहे.
कोणती आहेत सात आदर्श महाविद्यालये?
जालना जिल्ह्यातील घनसांवगी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संलग्र), बुलढाणा (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती), रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन (श्रीमती नाथीबाई दामोदार ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई), हिंगोली (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), गडचिरोली (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), रत्नागिरी जिल्ह्यात आंबवडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळेरे येथे (मुंबई विद्यापीठ मुंबई, संलग्र) ही सात आदर्श महाविद्यालये आहेत.
