Kalyan-Ahilyanagar Highway Accident: पुलाचं काम अर्धवट तरी वाहतूक सुरू, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघातात 11 जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या जीवाशी खेळ
Kalyan Accident: रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही या महामार्गावर वाहतूक सुरूच होती. त्यात वाहनचालक वेगमार्यादेचे पालन करत नसल्यामुळे हा अपघात झाला होता.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर रायते पूल दरवर्षी पाण्याखाली जाऊन कल्याण व पलीकडच्या गावांचा संपर्क तुटत असल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्या पुलाचे काम सुरू केले आहे. मात्र या पुलाचे काम अर्धवट स्थितीत असतानाच, वाहनचालकांनी त्याचा वापर सुरू केला आहे. काँक्रीटच्या या खड्डेमुक्त रस्त्यावरून वाहनचालक वेगाची मर्यादा न पाळता वाहने पळवतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे.
सोमवारची सकाळ उजाडली तीच या पुलावरील अपघाताने. या पुलावरच एक मार्गिका कामासाठी बंद असल्याने, येणारी आणि जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेवरून सुरू होती. याच ठिकाणी झालेल्या अपघातात ११ प्रवाशांना जीव गमवावा लागला. वाहनात क्षमतेच्या दुप्पट प्रवासी भरून भरधाव वाहन चालवणाऱ्या प्रशांत चेंदणे या चालकानेही यात प्राण गमावले.
Kalyan-Ahilyanagar Highway Accident : कल्याण-नगर महामार्ग अपघातात एका कुटुंबातील तिघांसह महसूल अधिकारीही दगावला; आजी आश्चर्यकारकरीत्या बचावली, मृतांची नावे समोर
अपघातानंतर पुलावरील अडथळे हटवून पुलाच्या उर्वरित कामाचा वेग वाढविण्यात आला. वाहतूक पोलिसांनी मिक्सर आणि चक्काचूर झालेली व्हॅन रस्त्यावरून बाजूला हटवून, रस्ता मोकळा केला. अपघातग्रस्त जागेची पाहणी पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली..
भीषण अपघाताने खळबळ
कोणी सुट्टीसाठी घरी निघालेले तर कोणी कामावर, कोणाच्या हातात औषधे होती, तर कोणी भाजीपाला विकून घरी निघाले होते… मात्र त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला. कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर झालेला अपघात इतका भीषण होता की, सिमेंट मिक्सरखाली चिरडलेल्या इको गाडीतील सर्व ११ प्रवाशांचा क्षणार्धात मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.
मात्र त्यांच्या हाती लागले ते मृतदेहच. चेहऱ्यावर, मानेत, पाठीत घुसलेल्या तारा कशाबशा काढत स्थानिकांनी ‘कोणी तरी वाचेल,’ या आशेने सर्वांना तत्काळ गोवेली रुग्णालयात पोहोचवले. पण सर्वांचेच श्वास शांत झाले होते. वाहतूक पोलिस, शहर पोलिस, आरटीओ, तहसीलदार, तलाठी यांनी धाव घेतली. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनीही तत्काळ पोहोचत विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात सर्वत्र किंकाळ्या, आक्रोश आणि हंबरडे हेच ऐकू येत होते. यातच मृतदेहांची ओळख पटवण्याची धडपड सुरू झाली.
Kalyan-Ahilyanagar Highway Accident : ईको कारला सिमेंट मिक्सर ट्रकची धडक, एका क्षणात 11 जणांचा करुण अंत, कल्याण अहिल्यानगर महामार्गावर दुर्दैवी घटना
कल्याणकडून मुरबाडकडे निघालेल्या इको व्हॅनमध्ये चालकाने नेहमीप्रमाणे ११ प्रवासी कोंबून सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास प्रवास सुरू केला. रस्ता मोकळा असल्याने त्याने वाऱ्याच्या वेगाने व्हॅन पळवली होती. रायते पुलाचे काम सुरू असल्याने, अनेक ठिकाणी खोदलेला रस्ता, अनेक ठिकाणी एक मार्गिका बंद करत वळवलेला रस्ता यांमुळे हा रस्ता अपघाताला कारणीभूत ठरू शकतो याची कल्पना दररोज या मार्गावर इको व्हॅन चालविणाऱ्या चालकाला होती. मात्र तरीही प्रवाशांच्या जिवाशी खेळ करत, त्याने वेग कमालीचा वाढवला होता. रायते पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला जागा देताना, अचानक त्याचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन मिक्सरवर धडकली. या अपघातात व्हॅनचा चक्काचूर झाला. काय घडतेय, हे समजण्याआधीच प्रवाशांनी प्राण गमावले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा