• Sat. Jul 4th, 2026

    समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 10, 2026
    समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    अमरावती, दि. 10 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. संविधानाच्या मूल्यांवर भारतीय लोकशाही आधारित आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या निधीतून विशेष तरतूद केली जाते. या लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित ‘समता सप्ताह’ अंतर्गत विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार आणि लाभ वितरण सामाजिक न्याय भवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील,  जिल्हाधिकारी आशिष येरेकर ,प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर आदी यावेळी उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, भारतीय संविधानामुळे आज 140 कोटी भारतीय एकत्रित आहे. ही संविधानाची ताकद आहे. ‘समता सप्ताह’ सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. शहरातील इर्वीन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष स्मारक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शैक्षणिक सुविधेअभावी एकही विद्यार्थी मागे पडू नये याची दक्षता घ्यावी.  नागपूरच्या धर्तीवर अमरावतीमध्येही समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी अद्यावत अभ्यासिका आणि ई-लायब्ररी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    यावेळी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनामार्फत नोकरीचे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे, ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने’अंतर्गत लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप  करण्यात आले.  समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात आणि अभ्यासिकांमध्ये अभ्यास करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती तसेच इतर विविध योजनांच्या लाभांचे वितरणही यावेळी करण्यात आले.

    सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांच्या माहिती पुस्तिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले. समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आणि आभार श्रीकृष्ण पखाले यांनी केले.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed